दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

| Updated on: Sep 19, 2021 | 8:20 PM

अंबरनाथमध्ये पोलिसाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक व्हावी, अशी मागणी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलिसाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने विजेचं गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिल भरलं नव्हतं. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने महाविरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदय नगर परिसरात सत्यम ऑलिएंडर नावाचं गृहसंकुल आहे. या गृहसंकुलातील एका इमारतीत मुकेश जाधव हे पोलीस कर्मचारी राहतात. मुकेश जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत असून मुंबई उपनगर परिसरात ते कार्यरत आहेत. मुकेश जाधव यांनी त्यांचं 2 महिन्यांचं विजेचं बिल न भरल्यामुळे महावितरणने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली.

महावितरणाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

संबंधित कारवाई करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी मोरेश्वर घावट गेले होते. ज्यावेळी घावट यांनी वीजपुरवठा खंडित केला, त्यावेळी मुकेश जाधव हे घरीच होते. त्यामुळे त्यांनी इमारतीखाली येऊन घावट यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पॅन्ट पकडून ओढत नेलं आणि अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, असा घावट यांचा आरोप आहे.

महावितरणाच्या कर्मचाऱ्याची पोलिसात तक्रार

या प्रकारानंतर घावट यांनी त्यांच्या वरिष्ठांसह अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. दुपारी ही तक्रार दिल्यानंतर रात्री 3 वाजता घावट यांच्या तक्रारीवरुन पोलीस कर्मचारी मुकेश जाधव याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, आणि मुजोरांना वचक बसावा यासाठी याप्रकरणी मुकेश जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला.

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका काय?

या प्रकरणावर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी प्रतिक्रिया दिली. “खरंतर महावितरण कंपनी अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्या कंपनीचे कर्मचारी आणि अभियंते दिवसरात्र काम करत आहेत जेणेकरुन महावितरणाची अवस्था चांगली व्हावी. पण असं करत असताना सरकारी कर्मचारी असलेले पोलीस मुकेश जाधव यांच्याघरी वीज कापली असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला एवढा वेळ लागत असेल तर आश्चर्य आहे. कारण असा घटनाक्रम पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडली असती तर त्यांनी ताबोडतोब आमच्चा कर्मचाऱ्याला अटक करुन आतमध्ये टाकलं असतं”, असं कृष्णा भोयर म्हणाले.

“दुपारी घडल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया होते ही बाब म्हणजे निषेधार्थ आहे. आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांचा निषेध करतो. आम्ही जनतेचे सेवक आहोत. हा घटनाक्रम घडत असताना पोलिसांना याप्रकरणी ताबोडतोब कारवाई करत अटक केली पाहिजे होती. सरकारी कामात अडथळा आणणं हीच गंभीर बाब आहे. कंपनी ही वीजग्राहकाची आहे. ती जगली पाहिजे, ही आमचीसुद्धा भूमिका आहे. आमचा कोणत्याही ग्राहकावर बळजबरी करण्याचा उद्देश नाही. पण वापरलेल्या वीजेचं बिल भरलं पाहिजे. भरलेल्या विजेच्या बिलाची पावती दाखवली तर अशा घटना घडत नाहीत. याप्रकरणी वीजग्राहकाला अटक व्हावी. जेणेकरुन अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या इतर वीज ग्राहकांना जबर बसेल. आमच्या कर्मचाऱ्याचंही मनोबल वाढेल. अखेर काल उशिरा का असेना गुन्हा दाखल झाला”, असं देखील ते म्हणाले.

हेही वाचा : दोस्त दोस्त ना रहा, मित्रच बनला शत्रू, उल्हासनगरात हत्येची दुसरी घटना, कारण फक्त…