ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर आता ठाण्यातील आणखी एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील चरई येथील ज्वेलर्स व्यापारी भरत जैन यांचा मृतदेह शुक्रवारी (20 ऑगस्ट) मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ठाण्यातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
भरत जैन गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी सीमा जैन यांनी 15 ऑगस्ट रोजी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आपल्या पतीची मिसिंगची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सर्वच बाजूंनी विचार करत जैन यांच्या ज्वेलर्स दुकानावर तपासासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पोलीस ज्वेलर्स दुकानात गेले. तिथे गेल्यावर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी ज्वेलर्सच्या दुकानात आणि परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यामध्ये चोरीची घटना कैद झालेली आढळली. एक ओला कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याचं निषपण्ण झालं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित ओला चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत दोन ते तीन आरोपी बसताना दिसत आहेत. त्या सर्वांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी बऱ्याच घडामोडी घडल्या. मनसुख हिरेन हे हिरे व्यापारी होते. त्यांचा रेतीबंदर परिसरात मृतदेह सापडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास थेट मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे एटीएस आणि त्यानंतर एनआयए यांच्याद्वारे या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरुच आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ही घटना ताजी असताना ठाण्याच्या आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह रेतीबंदर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
दारुच्या नशेत जन्मदात्या आईची हत्या, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला