TET Exam | टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये; पुणे पोलिसांनी दोघांना उचलले
पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याचे बिंग फोडले होते. त्यात तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीने 5 कोटी रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

नाशिकः लाखो तरुणांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या आणि महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या टीईटी (TET) अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षेचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यात आढळलेत. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी नांदगाव तालुक्यातील दोघांना उचलले आहे. त्यामुळे त्यांची नेमकी काय भूमिका होती, याची चर्चा सुरूय. विशेष म्हणजे यापूर्वीच टीईटी परीक्षेत गैरप्रकार (Maha TET exam) झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेला तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह अनेकांना बेड्या ठोकल्यात.
नेमके प्रकरण काय?
पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याचे बिंग फोडले होते. त्यात तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीने 5 कोटी रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध घेतला जातोय. दरम्यान, तब्बल सात हजारपेक्षा जास्त लोकांना पैसे देऊन पात्र केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तपासाला पुन्हा वेग
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सायबर पोलिसांतून अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही काळ याप्रकरणाचा तपास थंडावला होता. मात्र, आता पुन्हा एकदा याप्रकरणी तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी लातूर आणि बुलढाणा येथेही संशयितांना दोन दिवसांपूर्वी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नांदगाव कनेक्शन कसे?
टीईटी पेपरफुटी प्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून पुणे पोलिसांनी दोघांना उचलले आहे. त्यात मुकुंदा सूर्यवंशी याला पूर्वीच ताब्यात घेतले आहे. तर आता नांदगावच्या राजेंद्र सोलंकीलाही ताब्यात घेतले आहे. मालेगाव तालुक्यातील आघार गावाजवळ त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. सोलंकीच्या मोबाइल लोकोशनवरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तो अनेक दिवसांपासून त्यांना चकवा देत असल्याचे समजते. आता याची भूमिका नेमकी काय, हे तपासात समोर येईलच.
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात