Hema Malini | धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुलींसाठी काय केलं? अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन

| Updated on: Jul 10, 2023 | 1:42 PM

सनी देओलचा मुलगा करण देओल काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. मात्र हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली या लग्नात कुठेच दिसल्या नाहीत. या लग्नानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पत्नी हेमा आणि मुलींसाठी भावूक पोस्ट लिहिली होती.

Hema Malini | धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुलींसाठी काय केलं? अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
Hema Malini and Dharmendra
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनी यांची जोडी ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय आहे. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि त्यांना ईशा-अहाना या दोन मुली आहेत. धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, तेव्हा ते प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. हेमा मालिनी यांना नेहमीच धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या कुटुंबाविषयी आदरपूर्वक बोलताना पाहिलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

‘लेहरें’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या की ईशा आणि अहाना या आपल्या दोन्ही मुलींच्या पाठिशी त्यांचे वडील धर्मेंद्र कायम उभे राहिले. मुलींच्या लग्नाविषयी धर्मेंद्र यांना खूप काळजी होती, असंही त्यांनी सांगितलं. “मला दोन मुली आहेत आणि त्या दोघींना मी खूप चांगल्या पद्धतीने लहानाचं मोठं केलं. त्या दोघींसाठी ते (धर्मेंद्र) नेहमीच हजर असायचे. हीच सर्वोत्कृष्ट बाब आहे की ते नेहमी आमच्यासोबत होते. ते मुलींच्या लग्नाविषयी खूप चिंतेत असायचे. दोन्ही मुलींचं लग्न वेळेत आणि योग्य व्यक्तीशी लग्न झालं पाहिजे, असं ते म्हणायचे. त्यावर मी त्यांना सांगायचे की, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल. देवाच्या आणि गुरू माँच्या कृपेने सर्वकाही चांगलं झालं”, असं त्या पुढे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

सनी देओलचा मुलगा करण देओल काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. मात्र हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली या लग्नात कुठेच दिसल्या नाहीत. या लग्नानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पत्नी हेमा आणि मुलींसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. वय आणि आजारपणाचं कारण देत त्यांनी पश्चात्तापसुद्धा व्यक्त केला होता.

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.