‘तोपर्यंत घटस्फोट होऊ नये म्हणजे झालं’; आलिया-रणबीरच्या नव्या घराच्या बांधकामावरून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

'घर बांधकामाच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ लांबलेलं बांधकाम समजायचं का', असा सवाल एका युजरने केला. तर 'यांचं घर बांधणार आहेत की महाल', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'हे घर पूर्ण बांधून होईपर्यंत दोघांचा घटस्फोट होऊ नये म्हणजे झालं', असाही उपरोधिक टोला नेटकऱ्याने लगावला.

तोपर्यंत घटस्फोट होऊ नये म्हणजे झालं; आलिया-रणबीरच्या नव्या घराच्या बांधकामावरून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स
रणबीर कपूर- आलिया भट्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 18, 2023 | 1:51 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुंबईतील नव्या घराचं बांधकाम गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे. लग्नानंतर आलिया आणि रणबीर या नवीन घरात राहायला जाणार होते. मात्र त्याचं बांधकाम पूर्ण न झाल्याने दोघं रणबीरच्या जुन्या घरीच राहात आहेत. गुरुवारी या दोघांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन संपूर्ण पाहणी केली. यावेळी पापाराझींनी दोघांचा व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या या घराचं बांधकामच अजून सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोघं घर बांधतायत की महाल, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

कन्स्ट्रक्शन साइटवर पोहोचलेले रणबीर आणि आलिया यावेळी त्यांच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसले. दोघांनीही बांधकामाची पाहणी केली आणि कामगारांना काही सूचनासुद्धा दिल्या. यावेळी रणबीरने फोटोग्राफर्सना अभिवादनसुद्धा केलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रणबीर आणि आलियाच्या घराचं बांधकाम नेमकं कधीपर्यंत पूर्ण होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली. म्हणूनच व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. ‘घर बांधकामाच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ लांबलेलं बांधकाम समजायचं का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘यांचं घर बांधणार आहेत की महाल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘हे घर पूर्ण बांधून होईपर्यंत दोघांचा घटस्फोट होऊ नये म्हणजे झालं’, असाही उपरोधिक टोला नेटकऱ्याने लगावला.

काही दिवसांपूर्वीच आलियाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली होती. यावेळी आलियाला सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मक आणि टीकाटिप्पणींचा सामना कसा करतेस असाही प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर तिने लिहिलं, ‘योग्य विचारपूर्वक केलेली टीका तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे. पण जे शब्द फक्त तुम्हाला दुखावण्यासाठी वापरले जातात, त्यांना तुम्ही संधी दिली तरच ते तुम्हाला दुखावू शकतात. तुम्ही जे आहात, ते कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतक्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने बनवा की बाहेरची नकारात्मका तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.’