अंबानी कुटुंबाचा थाट… 50 गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा, दिल्या अनेक महागड्या भेटवस्तू

| Updated on: Jul 03, 2024 | 10:00 AM

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: सोन्या - चांदीचे दागिने, 50 नव्या वधूंना स्त्रीधन, आवश्यक वस्तू, भांडी आणि बरंच काही... अंबानी कुटुंबियांना थाटून दिला 50 गरीब जोडप्यांचा संसार, सध्या सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चर्चा...

अंबानी कुटुंबाचा थाट... 50 गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा, दिल्या अनेक महागड्या भेटवस्तू
Follow us on

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आहे. 2 जुलै 2024 रोजी अंबानी कुटुंबाने ‘रिलायन्स कॉर्पोरेट पार्क’ येथे 50 वंचित जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. ज्यामध्ये जवळपास 800 पेक्षी अधिक लोकं उपस्थित होते. कार्यक्रामात उपस्थित असलेल्या सर्वांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यात नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देखील त्यांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते. सध्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सामूहिक विवाह सोहळ्याच्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये नीता अंबानी पती मुकेश यांच्यासोबत बसून मंत्रोच्चार करतानाही दिसत आहेत. सांगायचं झालं तर, 12 जुलै 2024 मध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे.

 

मुलाचं लग्न होण्याआधी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी 50 गरीब जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. पालघर याठिकाणी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. रिपोर्टनुसार, सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अंबानी कुटुंबियांनी महागड्या भेटवस्तू दिल्याची माहिती मिळत आहे.

 

 

सामुहिक विवाह सोहळ्यात नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या जोडप्यांना अंबानी कुटुंबाकडून काही भेटवस्तूही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये मंगळसूत्र, अंगठी आणि नथ यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना जोडवी, पैंजण यांसारखे चांदीचे दागिनेही भेट म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येक वधूला स्त्रीधन म्हणून एक लाख रुपयांचा धनादेशही दिल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

एवढंच नाही तर, विवाहित जोडप्यांना वर्षभरासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या जातील, ज्यामध्ये विविध प्रकारच्या 36 जीवनावश्यक वस्तू आणि भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, पंखे तसेच गाद्या आणि उशा यांचा समावेश आहे. सध्या सर्वत्र सामुहिक विवाह सोहळ्याची चर्चा सुरु आहे.