घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक – ऐश्वर्याने पोस्ट केला खास फोटो; सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा वर्षाव

अथिया शेट्टी, रितेश देशमुख, फरदीन खान, ईशा गुप्ता, तनिषा मुखर्जी यांसारख्या कलाकारांनीही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी हॅपी वहिनी आणि भाऊ', अशी कमेंट रितेशने या फोटोवर केली आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक - ऐश्वर्याने पोस्ट केला खास फोटो; सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा वर्षाव
Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 21, 2023 | 10:17 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. काही कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्यासोबत अभिषेक कुठेच न दिसल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांदरम्यान आता अभिषेक आणि ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत दोघांनी घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या फोटोचं निमित्त म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचा वाढदिवस. दोघांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त त्यांनी एकमेकांसोबतचा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

या दोघांच्या फोटोवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अभिनेता सोनू सूदने कमेंट्समध्ये हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर अथिया शेट्टी, रितेश देशमुख, फरदीन खान, ईशा गुप्ता, तनिषा मुखर्जी यांसारख्या कलाकारांनीही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅपी हॅपी वहिनी आणि भाऊ’, अशी कमेंट रितेशने या फोटोवर केली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक पहिल्यांदा 1999 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या त्यांच्या चित्रपटाच्या फोटोशूटदरम्यान भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल अभिषेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “ढाई अक्षर प्रेम के हा पहिला चित्रपट आम्ही एकत्र केला होता. त्यावेळी ऐश्वर्याला पाहून मी तिच्यासाठी वेडाच झालो होता.” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या चित्रपटानंतर दोघंही रमेश सिप्पी यांच्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र दिसले. मात्र, ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली.

2007 मध्ये अभिषेक त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीत बसून अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्नाचा विचार केला. यानंतर त्याने ठरवलं की, तो ऐश्वर्याला आता लग्नासाठी विचारणार आहे. या प्रपोजलचं वर्णन करताना अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला, “मी न्यूयॉर्कमध्ये माझ्या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. तेव्हा मी माझ्या हॉटेल रुमच्या बाल्कनीत बसलो होतो. तेव्हा माझ्या मनात ऐश्वर्यासोबत लग्नाचे विचार आले. त्यानंतर मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत नेलं आणि तिला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का?”

ऐश्वर्यानेही लगेच होकार दिला आणि 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केलं. या दोघांचं लग्न एखाद्या शाही लग्नापेक्षा कमी नव्हतं. या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर 2011 मध्ये दोघेही आराध्याचे पालक झाले.