अर्शद वारसीला ‘त्या’ अवस्थेत पाहून जया बच्चन भडकल्या; थेट म्हणाल्या..

| Updated on: Aug 08, 2024 | 12:21 PM

अभिनेता अर्शद वारसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. अर्शदच्या एका गोष्टीवरून जया बच्चन खूप नाराज झाल्या होत्या. त्यांनी त्याच्यासाठी थेट संदेशच पाठवला होता.

अर्शद वारसीला त्या अवस्थेत पाहून जया बच्चन भडकल्या; थेट म्हणाल्या..
Jaya Bachchan and Arshad Warsi
Image Credit source: Instagram
Follow us on

“कलाकारांचं व्यक्तिमत्त्व खूप हळवं असतं, तुम्ही त्यांना जराही काही बोललात की ते लगेच दुखावले जातात”, असं मत बॉलिवूडचा ‘सर्किट’ अर्थात अभिनेता अर्शद वारसीने मांडलं आहे. अर्शदने 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फिल्म इंडस्ट्रीत कशा पद्धतीने स्पष्टवक्तेपणा चालत नाही, याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. या गोष्टीवरून करिअरच्या सुरुवातीलाच त्याला अभिनेत्री जया बच्चन यांच्याकडून टोमणा ऐकावा लागला होता. तो किस्सासुद्धा अर्शदने या मुलाखतीत सांगितलं आहे.

कपड्यांवरून जया बच्चन यांनी सुनावलं

‘समदिश भाटिया’च्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने जया बच्चन यांनी त्याला ओरडल्याचा किस्सा सांगितला. एअरपोर्टवर व्यवस्थित कपडे परिधान न केल्यामुळे जया त्याच्यावर भडकल्या होत्या. याविषयी अर्शदने सांगितलं, “त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्रीत नवीनच होतो आणि माझं ज्ञान शून्य होतं. मी एका दुसऱ्याच विश्वातून इंडस्ट्रीत आलो होतो. ‘तेरे मेरे सपने’ या माझ्या पहिल्या चित्रपटासाठी आम्हाला हैदराबादला शूटिंगला जावं लागलं होतं. मी विमानात चड्डी आणि बनियान घालून बसलो होतो. डान्सर्स असल्याने आम्ही आधी तशाच कपड्यांत फिरायचो. जेव्हा जया बच्चन यांना माझ्या कपड्यांविषयी समजलं, तेव्हा त्यांनी दुसऱ्या व्यक्तीकडून माझ्यासाठी संदेश पाठवला. मिस्टर वारसी यांना प्रवास करताना व्यवस्थित कपडे परिधान करण्यास सांगा, असा तो संदेश होता.”

स्पष्टवक्तेपणा नडला

आणखी एका घटनेत अर्शदचा स्पष्टवक्तेपणा जया बच्चन यांना आवडला नव्हता. “एकेदिवशी जयाजींनी मला एका चित्रपटासाठी बोलावलं होतं. चित्रपटाबाबत लोकांची मतं जाणून घेण्यासाठी ते लोकांना आमंत्रित करायचे. त्यांनी मला विचारलं की चित्रपट कसा वाटला? त्यावर मी थेट उत्तर दिलं होतं, ‘बकवास’! हे ऐकताच त्यांनी मला एका कोपऱ्यात नेलं आणि म्हणाल्या, “तुझी मतं तुझ्याकडेच ठेवत जा.” अशा घटनांमधून मी शिकत गेलो. चित्रपट कितीही वाईट असला तरी तुम्हाला सत्य बोलता येत नाही”, अशी खंत अर्शदने व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

अर्शदच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, तो अक्षय कुमार आणि क्रिती सनॉन यांच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात झळकला होता. यानंतरच त्याचे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘जॉली एलएलबी 3’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.