मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून..; पुणे अपघातप्रकरणी हृषिकेश जोशीची संतप्त पोस्ट
पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. मोटारचालक शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
![मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून..; पुणे अपघातप्रकरणी हृषिकेश जोशीची संतप्त पोस्ट मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून..; पुणे अपघातप्रकरणी हृषिकेश जोशीची संतप्त पोस्ट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Hrishikesh-Joshi-on-Pune-accident.jpg?w=1280)
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री मद्यप्राशन करून भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून त्याची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आक्रमक झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. या घटनेबाबत विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी अभिनेता हृषिकेश जोशीने फेसबुक पोस्ट लिहित निबंधाच्या शिक्षेवरून ताशेरे ओढले आहेत. हृषिकेशची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हृषिकेश जोशीची पोस्ट-
न्यायालयाने आरोपी अल्पवयीन मुलाला काही अटींवर जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने त्याला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्याने 300 शब्दांचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असं सांगितलं गेलं. या निबंधाबाबत हृषिकेशने संतप्त पोस्ट लिहिली आहे. ‘मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा.. (पुणेप घात)’, अशा शब्दांत त्याने टोला लगावला आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ranveer-Singh-grandfather.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Sushmita-Sen-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Salman-and-Salim-Khan-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/bigg-boss-marathi.jpg)
दरम्यान या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपींच्या वडिलांसह पोलिसांनी मंगळवारी चौघांना बेड्या ठोकल्या. बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली. त्याबरोबरच कोझी हॉटेलचा मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ब्लॅकचा मालक संदीप रमेश सांगळे यांनाही अटक करण्यात आली आहे.
अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. अनीशचा मित्र अकीब मुल्ला याने याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अकीब आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील बॉलर पबमध्ये गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते कल्याणीनगर चौकातून निघाले असताना त्यावेळी एका भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अनीशला धडक दिली. मोटारीची धडक एवढी जोरात होती की अनीश आणि दुचाकीवर त्याच्या मागे बसलेली अश्विनी उंच फेकले गेले. रस्त्यावर आपटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.