India vs Canda Issue | शुभला विरोध सुरु असताना एपी ढिल्लोची पोस्ट चर्चेत
India vs Canda Issue | भारत-कॅनडा वाद सुरु असताना शुभची मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाला. आता प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लोची पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये एपी ढिल्लोने काय म्हटलय?.

मुंबई : सध्या भारत आणि कॅनडामध्ये संघर्ष सुरु आहे. या वादादरम्यान पंजाबी, कॅनडीयन गायक रॅपर शुभला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. शुभने भारताचा चुकीचा नकाशा सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून त्याचा विरोध सुरु झाला होता. शुभने या प्रकरणात आपल मौन सोडलं आहे. भारताचा दौरा रद्द झाल्याबद्दल त्याने दु:ख व्यक्त केलं. सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दरम्यान पॉपुलर गायक एपी ढिल्लोच वक्तव्य सुद्धा समोर आलय. सिंगरने रिएक्शन देताना आपली इन्स्टा स्टोरी शेअर केलीय. एपी ढिल्लोंने शुभच नाव न घेता आपला मुद्दा मांडला. एपी ढिल्लोंने स्टोरी शेअर केलीय.
“मी सगळ्याच सोशल मेनियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मी काही बोललो किंवा केलं, तरी त्याला अर्थ नाही. कोणातरी आपल्या हिशोबाने गोष्ट फिरवणार आणि जास्त विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. एक कलाकार म्हणून कलेवर लक्ष देता येत नाही. मी प्रत्येकाच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. पण एका पॉइंटवर अजाणतेपणी विभाजनाला बळ मिळू नये म्हणून प्रत्येक पाऊल टाकण्याआधी दोन ते तीन वेळा विचार करावा लागतो” असं एपी ढिल्लोने म्हटलय. “आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी राजकीय पक्ष आमच्या प्रतिमेचा सातत्याने वापर करतात. कोणाचा रंग, वर्ण, धर्म, राष्ट्रीयता न पाहता व्यक्तीगत स्तरावर लोकांना मदत होईल अशी कला सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो” असं एपी ढिल्लोने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिलय. एपी ढिल्लोने शेवटी काय म्हटलय?
एपी ढिल्लोने शेवटी लिहिलय की, “द्वेष नको प्रेम द्या. आपण स्वत: बद्दल विचार करुया. द्वेषाचा प्रभाव आपल्या श्रद्धेवर हावी होणार नाही, याची काळजी घेऊया. आपण सगळे एक आहोत. मानव निर्मिती सामाजिक रचनेमुळे आपल्यात विभाजन होणार नाही, याची काळजी घेऊया. एकता ही भविष्याची चावी आहे” असं एपी ढिल्लोने म्हटलय. एपीची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना आवडलीय. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन सध्या भारत-कॅनडा संबंधात मोठा तणाव निर्माण झालाय. कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केलाय. भारतानेही कॅनडाला जशास तस प्रत्युत्तर दिलय. दोन्ही देश परस्पराविरोधात पावल टाकतायत. यात कॅनेडीयन गायक शुभचा भारत दौरा रद्द झालाय. त्याने खलिस्तान समर्थकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.