Kangana Ranaut | ‘इंडियनचा अर्थ केवळ गुलाम..’; ‘इंडिया-भारत’ नावाच्या वादात कंगनाची उडी

| Updated on: Sep 06, 2023 | 9:23 AM

'इंडिया' आणि 'भारत' या नावांवरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेत्री कंगना रनौतने त्यावर ट्विट केलं आहे. याआधी बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनीसुद्धा 'भारत माता की जय' असं ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Kangana Ranaut | इंडियनचा अर्थ केवळ गुलाम..; इंडिया-भारत नावाच्या वादात कंगनाची उडी
Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : दिल्लीमध्ये ‘जी-20’ समिटच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला सरकारी डिनरचं आयोजन केलं. त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंड ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला. यामुळे मंगळवारी देशभरात राजकीय वादंग माजला. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधान दुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्द वगळून देशाचा उल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांवरून वाद सुरू असताना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ‘भारत माता की जय’ असं ट्विट केलं. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतचेही ट्विट्स चर्चेत आले आहेत.

‘इंडियनचा अर्थ गुलाम’

कंगनाने ट्विट करत लिहिलं की डिक्शनरीमध्ये इंडियनचा अर्थ गुलाम सांगितलं जात होतं. नुकतंच त्याला बदलण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘या नावात प्रेम करण्यासारखं काय आहे? सर्वांत आधी ते सिंधूचा उच्चार करू शकले नव्हते. त्यामुळे त्या नावाचं त्यांनी ‘इंडस’ करून टाकलं. त्यानंतर कधी हिंदोस, कधी इंदोस तर कधी काही गोलमाल करून इंडिया नाव ठेवलं. महाभारतापासून कुरुक्षेत्राच्या महान युद्धात सहभागी होणारे सर्व राज्य भारत नावाच्या एका महाद्वीपअंतर्गत यायचे. तर मग ते आपल्याला इंदु-सिंधु का म्हणायचे?’

हे सुद्धा वाचा

कंगनाचं ट्विट

‘आपण भारतीय, इंडियन नाही’

‘भारत हे नावच इतकं सार्थ आहे, पण इंडियाचा काय अर्थ आहे? मला माहितीये की ते रेड इंडियन म्हणायचे कारण जुन्या इंग्रजीत इंडियनचा अर्थ फक्त गुलाम म्हणून होता. त्यांनी आपल्याला इंडियन नाव दिलं कारण ती आपली नवी ओळख होती, जी आपल्याला इंग्रजांनी दिली होती. जुन्या जमान्याच्या डिक्शनरीमध्येही इंडियनचा अर्थ गुलाम म्हटलं गेलंय. आता त्याचा अर्थ बदलण्यात आला आहे. हे आपलं नाव नाही, आपण भारतीय आहोत, इंडियन नाही’, असंही कंगना पुढे म्हणाली.

दोन वर्षांपूर्वीच कंगनाने केली होती मागणी

या ट्विट्ससोबतच कंगनाचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी कंगनाने म्हटलं होतं की या देशाचं नाव इंडिया नव्हे तर भारत असं केलं पाहिजे. हेच वक्तव्य शेअर करत कंगनाने ट्विटरवर लिहिलं, ‘काही लोक याला काळी जादू म्हणतात. हा फक्त ग्रे मॅटर आहे. सर्वांना शुभेच्छा. एका गुलामाच्या नावातून मुक्ती, जय भारत!’