‘द काश्मीर फाइल्स, गदर 2 सारखे चित्रपट कसे हिट होऊ शकतात?’; नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य चर्चेत

| Updated on: Sep 11, 2023 | 9:27 AM

दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी गदर 2, द केरळ स्टोरी, द काश्मीर फाइल्स यांसारख्या चित्रपटांवर ताशेरे ओढले आहेत. असे चित्रपट हिट होत असल्याचं पाहून खूप त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

द काश्मीर फाइल्स, गदर 2 सारखे चित्रपट कसे हिट होऊ शकतात?; नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य चर्चेत
Naseeruddin Shah
Follow us on

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच त्यांची मतं बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. बॉलिवूड इंडस्ट्री असो, हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा राजकीय-सामाजिक विषय.. ते अत्यंत मोकळेपणे व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’, आणि ‘गदर 2’ यांसारख्या चित्रपटांवर ताशेरे ओढले. असे चित्रपट हिट होताना पाहून खूप त्रास होतो, असं ते म्हणाले. नसीरुद्दीन शाह यांनी तब्बल 17 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलंय. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं असून यानिमित्त त्यांनी ही मुलाखती दिली.

17 वर्षांनंतर कमबॅक

दिग्दर्शन क्षेत्रात कमबॅक करण्यासाठी 17 वर्षांची प्रतीक्षा का केली, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी इतका वाईट चित्रपट बनवल्याच्या धक्क्यातून सावरत होतो. मला जशी अपेक्षा होती, तसा तो बनला नव्हता. त्यावेळी पटकथालेखनाच्या बाबतीत किंवा चित्रपटाच्या बाबतीत पुरेसं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. मी फक्त असा विचार केली की जर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांना एकत्र आणलं तर उत्तम चित्रपट बनू शकेल. मला स्क्रिप्टसुद्धा ठीक वाटली होती. पण नंतर एडिटिंग करताना त्यात काही त्रुटी दिसून आल्या. विशेषकरून इरफान खानच्या कथेत. माझ्यासाठी ती खूप मोठी निराशा होती. त्यामुळे मी त्या सर्व गोष्टींची जबाबदारी घेतो. मी पुन्हा कोणता चित्रपट बनवेन असा विचार केला नव्हता. कारण त्यात प्रचंड मेहनत असते.”

“आता फक्त देशावर प्रेम करणं पुरेसं नाही”

बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यामागचा उद्देश बदलला आहे का असा प्रश्न विचारला असता नसीरुद्दीन शाह यांनी मोकळेपणे आपलं मत मांडलं. “हो, आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके अधिक तुम्ही लोकप्रिय व्हाल. कारण सध्या देशात त्याच गोष्टीचं राज्य आहे. आता फक्त तुमच्या देशावर प्रेम करणं पुरेसं राहिलेलं नाही. पण जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागतंय. या लोकांना ही गोष्ट समजत नाहीये की ते जे करत आहेत ते खूप हानीकारक आहे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट लोकप्रिय होत असल्याचं पाहून..”

“द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की असं असूनही ही लोकं चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचं काम थांबवत नाहीयेत”, असंही शाह म्हणाले.

“सर्व चुकीच्या गोष्टींचं कौतुक केलं जातं अन्..”

‘गदर 2’ चित्रपटाबाबद नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले, “चांगले दिग्दर्शक हे चांगली पिढी घडवण्यासाठी जबाबदार असतात. शंभर वर्षांनंतर लोक ‘भीड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा ‘गदर 2’ पाहतील, तेव्हा आपल्या काळातील कोणत्या चित्रपटातून सत्य मांडलंय हे ते जाणून घेतील. कारण चित्रपट हे एकमेव माध्यम आहे, ज्यामधून हे साध्य होऊ शकतं. आयुष्य जसं आहे तसं दाखवणं खूप कठीण आहे. त्यामुळे सध्या जे चाललंय त्याला प्रतिगामी हा अत्यंत सौम्य शब्द आहे. जिथे सर्व चुकीच्या गोष्टींचं कौतुक केलं जातं आणि इतर समुदायाला कोणत्याही कारणाशिवाय खाली पाडलं जातं. हा खूप भयानक ट्रेंड आहे.”