स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीप आणि गौरीची भेट झाली आहे. पण ज्या शालिनीमुळे या दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागलं, तिला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित्त देण्यासाठी जयदीप वेषांतर करून शिर्के-पाटलांच्या घरात दाखल होणार आहे.
यासाठी जयदीप वृद्ध बनला आहे आणि तो लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं भासवणार आहे. शालिनीने चिमुकल्या लक्ष्मीला जीवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला शिर्के-पाटलांच्या घरापासून दूर राहावं लागलं.
जयदीप गौरीपासूनही दुरावला. मात्र आता जयदीप आणि गौरी एकत्र आले आहेत. आपल्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीला दिलेल्या त्रासाचा बदला आता जयदीपला घ्यायचा आहे. यासाठी त्याने वृद्धाचं रुप घेतलं आहे.
पैशांसाठी शालिनी वेडी आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक घरी आलाय म्हटल्यावर त्याच्या पैशांवरही तिचा डोळा आहे. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते. त्यामुळे जयवंत देशमुखच्या अवतारात असलेल्या जयदीपच्या तालावर शालिनी कशी नाचणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे पुढील भाग रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.