पहिल्याच प्रयत्नात रितेशने मारली बाजी; ‘बिग बॉस मराठी 5’च्या यशावर म्हणाला..

| Updated on: Aug 20, 2024 | 12:16 PM

अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच 'बिग बॉस मराठी 5'चं सूत्रसंचालन केलंय आणि त्या पहिल्याच प्रयत्नात त्याला चांगलं यश मिळालं आहे. भाऊचा धक्का या त्याच्या वीकेंडच्या एपिसोडला सकारात्मक रेटिंग मिळाली आहे. त्यावर आता रितेशने प्रतिक्रिया दिली आहे.

पहिल्याच प्रयत्नात रितेशने मारली बाजी; बिग बॉस मराठी 5च्या यशावर म्हणाला..
Riteish Deshmukh
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या शोला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. याच प्रतिसादामुळे शोचा टीआरपीसुद्धा उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सिझनमध्ये सूत्रसंचालक म्हणून पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखला संधी देण्यात आली आहे. याआधीच्या चारही सिझन्सचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. रितेश त्यांची जागा घेऊ शकणार का, शोला पहिल्यासारखा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र रितेशलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. वीकेंडच्या एपिसोडला 3.2 इतकी रेटिंग मिळाली आहे. ‘भाऊचा धक्का’ या सेगमेंटवरही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. पहिल्याच प्रयत्नात इतकं मोठं यश मिळाल्याप्रकरणी आता रितेशने आनंद व्यक्त केला आहे.

याविषयी रितेश म्हणाला, “बिग बॉस मराठीचं यश हे शोबद्दल प्रेक्षकांचं असलेलं प्रेम आणि उत्कटतेचं उदाहरण आहे. सकारात्मक रेटिंग आणि प्रत्येक आठवड्यातील वाढता आलेख पाहणं हे खूप प्रेरणादायी आहे. भाऊचा धक्का या वीकेंड स्पेशल एपिसोडमधील वातावरण महाराष्ट्राचं भावविश्व प्रतिबिंबित करतं. या ऊर्जेला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळतोय, तो खरोखरंच आनंददायी आहे. ही नवी संधी स्वीकारल्याबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या आशादायक परिणामांना पाहून मी खूप खुश आहे.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन हा पहिल्याच एपिसोडपासून चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण यांचाही समावेश आहे. महेश मांजरेकर यांच्या सूत्रसंचालनाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे रितेश त्यांची जागा घेऊ शकणार का, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला होता. मात्र रितेशनेही त्याच्या खास स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

“जेव्हा पहिल्यांदा माझी निवड झाली, तेव्हा मला असं वाटलं होतं की, अरे मीच का? इतरही स्टार आहेतच की. पण आता जेव्हा रितेश देशमुखचं नाव ऐकलं तेव्हा वाटलं की अरे वाह! नशिब त्यांनी रितेशला पहिल्याच सिझनसाठी घेतलं नाही, नाहीतर मी तो शो कधीच केला नसता (हसतात). तसंही चार वर्षे मी तो शो खूप एंजॉय केला होता. बदल करणं हे त्यांच्या हातात होतं. पण हा सिझन मला तितक्याच आवडीने पाहता येईल. मी जे काम केलं, त्याचं मला खूप समाधान आहे. लोकांनाही बदल हवा असतो. रितेशसाठी मी खूप सकारात्मक आहे. तो हा शो गाजवेल असा मला विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली होती.