खोटं, लोभ अन् फसवणूक.. आरजे महवशचा धनश्रीला टोमणा? चहलकडून पोटगी मागितल्यानंतरची पोस्ट
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आरजे महवशच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. धनश्रीने चहलकडे साडेचार कोटींची पोटगी मागितल्याचं समजतंय. त्यानंतर महवशने ही पोस्ट लिहिली आहे.

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, कोरिओग्राफर, डान्सर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. चहलने धनश्रीला पोटगी म्हणून 4.5 कोटी रुपये देण्याची सहमती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. या पोटगीच्या वृत्तानंतर आरजे महवशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खोचक पोस्ट लिहिली आहे. आरजे महवश आणि युजवेंद्र एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. महवशने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वत:चेच काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय, त्याची सध्या चर्चा होत आहे.
आरजे महवशने लिहिलं, ‘खोटं, लोभ आणि फसवणुकीच्या पलीकडचं आहे.. देवाची कृपा आहे की आरसे आजसुद्धा उभे आहेत.’ तिच्या या पोस्टने लगेचच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. इतकंच नाही तर युजवेंद्रनेही तिच्या या पोस्टला लाइक केलंय. त्यामुळे नेटकरीसुद्धा विविध प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. ‘चहलने दहा सेकंदात लाइक केलं’, असं एकाने लिहिलं. तर ‘चहल भावाचा आता आयपीएलमधील कमबॅक पाहण्यासारखा असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘युझी भावाचे 55 कोटी रुपये वाचवले’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.




View this post on Instagram
महवशच्या या पोस्टच्या आधी धनश्रीने युजवेंद्रकडे 60 कोटी रुपये पोटगीची मागणी केल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा धनश्रीच्या कुटुंबीयांनी फेटाळल्या होत्या. “पोटगीबाबत पसरवल्या जाणाऱ्या तथ्यहीन वृत्तांबद्दल आम्हाला खूप राग आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की धनश्रीकडून अशी कोणतीही रक्कम मागितली गेली नाही. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही”, असं त्यांनी म्हटलं होतं.
धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती धनश्रीच्या वकिलांनी दिली. यादरम्यान गुरुवारी या दोघांनी कोर्टात पाहिलं गेलं. लवकरच त्यांच्या घटस्फोटाबाबत निर्णय होणार असल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे घटस्फोटाबाबत कोणतंही वृत्त जाहीर करण्यासाठी तथ्य तपासून पाहण्याची विनंती धनश्रीच्या वकिलांनी केली. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलंय की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.