5 वर्षांनंतर नितीश चव्हाणची पुन्हा मराठी मालिकेत एन्ट्री; म्हणाला, ही संधी मला…
Actor Nitish Chavan on Lakhat Ek Amcha Dada Serial : अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा मराठी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने नितीश चव्हाण याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने 'दादा' होण्याची भावना व्यक्त केली. वाचा सविस्तर...
![5 वर्षांनंतर नितीश चव्हाणची पुन्हा मराठी मालिकेत एन्ट्री; म्हणाला, ही संधी मला... 5 वर्षांनंतर नितीश चव्हाणची पुन्हा मराठी मालिकेत एन्ट्री; म्हणाला, ही संधी मला...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Nitish-Chavan-1.jpg?w=1280)
‘लागीर झालं जी’ या मालिकेतील अज्या अर्थातच अभिनेता नितीश चव्हाण हा पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नितीश चव्हाण दिसणार आहे. याआधी ‘फौजी’ची भूमिका नितीशने साकारली होती. या भूमिकेनंतर आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून नितीश प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत चार बहिणी आणि त्यांच्या भावाचं अतुट नातं दाखवण्यात आलं आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर नितीश चव्हाण याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सूर्यादादा’मुळे मला दादा बनायची संधी मिळाली, असं नितीश चव्हाण म्हणाला.
नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. एका नवीन मालिकेची यात भर पडली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भावा- बहिणींच्या नात्यांवर आधारित असलेल्या या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाची भूमिका साकारत आहे. नितीशने मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्याच्या भावना सांगितल्या.
View this post on Instagram
नितीश चव्हाण काय म्हणाला?
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेसाठी निवड कशी झाली. यावर अभिनेता नितीश चव्हाण याने भाष्य केलं आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेसाठी मला वज्र प्रोडक्शनमधून खांबे सरांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट आहे. गोष्ट थोडी ऐकली आणि मला हा विषय नवीन वाटला मग मी खांबे सरांना परत कॉल केला आमचं अधिक बोलणं झालं आणि मी ठरवलं की या मालिकेचा भाग बनायचं…, असं नितीश म्हणाला.
माझी पहिली मालिका देखील झी मराठी आणि वज्र प्रोडक्शन सोबत होती. आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फिरतायत. जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये येतो तेव्हा एका सुरक्षित वातावरणात आल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते. सूर्यादादाच्या या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर , मला सख्खी बहीण नाही पण सूर्यादादा सारखंच माझ्या घरात उदाहरण आहे, असंही नितीश चव्हाण म्हणाला.