25 दिवसांच्या संन्यासानंतर ‘तारक मेहता..’च्या अभिनेत्याला करायचंय लग्न

| Updated on: Jul 10, 2024 | 2:56 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय एका अभिनेत्याने जवळपास 25 दिवस सर्व पोलीस यंत्रणांना भंडावून सोडलं होतं. कारण अचानकच तो बेपत्ता झाला होता आणि त्याचा शोधच लागत नव्हता. अखेर 25 दिवसांनंतर तो सुखरुप घरी परतला. आता त्याच अभिनेत्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

25 दिवसांच्या संन्यासानंतर तारक मेहता..च्या अभिनेत्याला करायचंय लग्न
'तारक मेहता का उल्टा चष्मा'
Image Credit source: Instagram
Follow us on

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाला होता. 22 एप्रिल रोजी त्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच हैराण केलं होतं. जवळपास 25 दिवसांपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. कुटुंबीय, सहकलाकार, नातेवाईक, मित्रपरिवार.. सर्वांनीच त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली होती. अखेर अचानक एकेदिवशी तो सुखरुप घरी परतला. या सर्व घटनेबाबत गुरुचरणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. त्याचसोबत त्याने आता लग्न करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण म्हणाला, “कोविड महामारीनंतर अनेक गोष्टींनी मी प्रभावित झालो होतो. 2020 मध्ये मी मुंबई सोडून वडिलांसोबत राहू लागलो. त्याचदरम्यान वडिलांचीही सर्जरी होती. तिथे मी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात मला यश मिळालं नाही. व्यवसायात एकतर काम चांगलं झालं नव्हतं आणि ज्या लोकांनी माझ्यासोबत मिळून तो व्यवसाय सुरू केला, ते नंतर गायब झाले. त्यांनी माझी फसवणूक केली होती. त्यातच प्रॉपर्टीवरूनही कुटुंबीत वाद सुरू होते. त्यात माझा बराच पैसा खर्च झाला होता. या सर्व कारणांमुळे मला बऱ्याच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.”

हे सुद्धा वाचा

“आर्थिक समस्यांमुळे मी खूप त्रस्त झालो होतो. आईवडिलांच्या प्रभावामुळे मला नेहमीच अध्यात्मात रस होता. त्यामुळे जेव्हा माझ्या आयुष्यातील अत्यंत पडता काळ सुरू होता, तेव्हा मी अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आणि जवळपास 25 दिवस मी एखाद्या संन्यासीप्रमाणे राहू लागलो होतो. मला परत यायचंच नव्हतं. मात्र देवाच्या संकेतामुळेच मी पुन्हा आलो. परत आल्यानंतर मी कोणाला मुलाखत दिली नव्हती. पण लोकांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून मी ही मुलाखत देतोय. माझं सर्व कर्ज फेडण्यासाठी मी पूर्ण मेहनत करायला तयार आहे. सध्या माझ्या हाती काहीच काम नाही. मी पुन्हा काम करून माझं सर्व कर्ज फेडू इच्छितो. त्यानंतर मला संसार थाटायचा आहे. मला लग्न करायचं आहे”, अशी इच्छा त्याने पुढे बोलून दाखवली.