‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यानंतर 3 आठवड्यांनी लेखकाने का मागितली माफी? जनभावनेची चिंता की आणखी काही..
आदिपुरुष या चित्रपटाचा विरोध केवळ प्रेक्षकांकडून झाला नाही. तर हायकोर्टाकडूनही निर्माते-दिग्दर्शकांवर ताशेरे ओढले गेले. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देणं ही सर्वांत मोठी चूक असल्याचं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निर्मात्यांना फटकारलं होतं.
!['आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर 3 आठवड्यांनी लेखकाने का मागितली माफी? जनभावनेची चिंता की आणखी काही.. 'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर 3 आठवड्यांनी लेखकाने का मागितली माफी? जनभावनेची चिंता की आणखी काही..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/02203235/Adipurush-1.jpg?w=1280)
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून प्रदर्शनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून देशभरात मोठा वाद सुरू आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यांनी लेखक मनोज मुंतशीर यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत सर्वांची माफी मागितली. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी स्वीकार करतो की आदिपुरुष या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी तुम्हा सर्व भाऊ-बहिणींची, मोठ्यांची, पूज्य साधू-संतांची आणि श्रीराम यांच्या भक्तांची हात जोडून विनाशर्त माफी मागतो. भगवान बजरंग बलीची कृपा आपल्या सर्वांवर असू दे. आपल्याला एकत्र आणि अतूट राहून पवित्र सनातन आणि महान देशाची सेवा करण्यासाठी शक्ती देवो.’ मात्र नेटकरी त्यांना इतक्या सहजरित्या माफ करण्यास तयार नाहीत. अनेकांनी या ट्विटच्या उत्तरात मनोज मुंतशीर यांच्या जुन्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. तर हा चित्रपट थिएटरमधून बाहेर जात असताना त्यांनी माफी का मागितली असा सवाल काहींनी केला.
आता माफी का मागितली?
अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं लोकप्रिय झाल्यानंतर मनोज मुंतशीर प्रकाशझोतात आले होते. त्यांची राष्ट्रप्रेमी असल्याची छवी बरीच चर्चेत होती. इतकंच नव्हे तर त्यानंतर मनोज मुंतशीर यांच्याकडे प्रोजेक्ट्सची रांग लागली होती. फिल्म इंडस्ट्रीपासून सरकारी कार्यक्रमांपर्यंत त्यांना महत्त्व दिलं जात होतं. मात्र आता आदिपुरुष या चित्रपटानंतर अनेकांनी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत केलं आहे.
उच्च न्यायालयानेही सुनावलं
आदिपुरुष या चित्रपटाचा विरोध केवळ प्रेक्षकांकडून झाला नाही. तर हायकोर्टाकडूनही निर्माते-दिग्दर्शकांवर ताशेरे ओढले गेले. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देणं ही सर्वांत मोठी चूक असल्याचं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निर्मात्यांना फटकारलं होतं. इतकंच नव्हे तर हायकोर्टाने चित्रपट निर्मात्यांना सर्व धार्मिक ग्रंथ आणि महाकाव्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. कुराण आणि बायबललाही हात लावू नका, असं कोर्टाने सांगितलं.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/10022037/Chhavi-Mittal.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/09234431/SRK-2.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/09212430/Hema-Malini-1-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/09201709/Akshay-Kumar-2.jpg)
आदिपुरुष या चित्रपटातील डायलॉग्सवरून जोरदार वाद झाल्यानंतर त्यातील काही संवाद बदलण्यात आले. इतकंच नव्हे तर तिकिटांची किंमत कमी करण्यात आली. असं करूनही चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होऊ लागला. याच कारणामुळे तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने हिंदीत आतापर्यंत फक्त 135 कोटी रुपयांची कमाई केली आहे.