कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय? वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका!

अभिनेता विकास सेठीचं वयाच्या 48 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. कमी वयात हार्ट अटॅक, कार्डिॲक अरेस्टच्या अनेक घटना याआधीही पहायला मिळाल्या आहेत. मात्र हे कशामुळे होतंय, त्याची लक्षणं काय आहेत, यांविषयीची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊयात..

कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय? वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका!
कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का वाढलंय? Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 12:53 PM

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता विकास सेठी याचं 8 सप्टेंबर रोजी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी विकासने आपले प्राण गमावले. याआधी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचंही वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे निधन झालं होतं. आता विकासच्या निधनानंतर पुन्हा एकदा कमी वयात कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट अटॅक येणं या चिंतेच्या बाबीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. श्रेयससुद्धा 48 वर्षांचाच आहे. आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असणारी अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या वर्षी जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं, असं सुष्मिताने सांगितलं होतं. तिच्यावरही अँजियोप्लास्टी झाली आणि स्टेंट लागले. सुष्मिता सेनसुद्धा 48 वर्षांची आहे. नियमित व्यायाम करणारे, डाएट पाळणारे, खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल सजग राहणारेसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कमी वयातच लोकांना हृदयविकाराचा त्रास का जाणवत आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

अभिनेता विकास सेठीची पत्नी जान्हवीने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की तो नियमित जिमला जात असे. पण निधनापूर्वी त्याला अपचन, जुलाब आणि उल्ट्यांचा त्रास जाणवू लागला होता. “नाशिकला माझ्या आईच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला उल्ट्या आणि जुलाब होऊ लागले होते. त्याला रुग्णालयात जायचं नव्हतं म्हणून आम्ही डॉक्टरलाच घरी बोलावलं होतं. रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास जेव्हा मी त्याला उठवायला गेले, तेव्हा त्याने प्राण सोडले होते. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आदल्या रात्रीच कार्डिॲक अरेस्टने त्याचं निधन झालं होतं”, अशी माहिती जान्हवीने पीटीआयशी बोलताना दिली होती.

Vikas Sethi

अपचन आणि कार्डिॲक अरेस्ट

सर्वसाधारणपणे चक्कर येणं, छातीत दुखणं यांसारखी लक्षणं येऊ घातलेल्या हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असतात. तर अपचनाची लक्षणं ही सामान्यत: छातीत जळजळ किंवा ॲसिडिटीशी संबंधित असतात. हीच लक्षणं कार्डिॲक अरेस्टचा इशाराही असू शकतात. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयातील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, “हृदयविकाराच्या झटक्याचं (मायोकार्डियल इन्फेक्शन) प्राथमिक लक्षण म्हणजे छातीत दुखणं. परंतु, हृदयविकाराच्या 8-33% प्रकरणांमध्ये छातीत दुखण्याचं लक्षण नसूही शकत.”

हे सुद्धा वाचा

जेव्हा हृदयातील रक्तप्रवाहात अचानक अडथळे निर्माण होतात, तेव्हा शरीर तणावपूर्ण प्रतिक्रिया देऊ लागते. यामुळे पचनावर परिणाम होतो आणि परिणामी अतिसार, उल्ट्या होतात. काही रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं निदान अनेकदा चुकतं किंवा निदान करण्यात उशीर होतो. मधुमेह, उच्चरक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या आरोग्याच्या समस्या असणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते, असंही डॉक्टर कुमार म्हणाले. ईसीजी आणि रक्त तपासणीद्वारे हृदयविकाराचं निदान होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

हार्ट अटॅकच्या 20 टक्के केसेसमध्ये लक्षात येण्यासारखी काही लक्षणंच नसतात, असं UCLA हेल्थमधील एका लेखात नमूद करण्यात आलंय. सर्व हृदयविकाराच्या झटक्यांप्रमाणेच सायलेंट हार्ट अटॅकमध्येही रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूचं नुकसान होऊ शकतं. सायलेंट हार्ट अटॅक आल्याने पुढे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आणखी वाढते. हृदयाशी संबंधित काही लक्षणं छातीतही जाणवू शकत नाही, त्यामुळे नेमकं काय होतंय हे ओळखणं कठीण होतं. जर तुम्हाला सर्वसामान्यापेक्षा कोणतीही असामान्य किंवा सौम्य लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं शहाणपणाचं ठरेल.

हार्ट अटॅक आणि छातीत जळजळ यात काय फरक आहे?

मेयो क्लिनिकच्या एका अहवालानुसार, जेवणानंतर, संध्याकाळच्या वेळी किंवा झोपल्यावर, वाकल्यावर छातीत जळजळ अधिक तीव्रतेने जाणवू शकते. अधूनमधून छातीत जळजळ होणं हे सामान्य आहे आणि त्यात चिंतेंच काही कारण नाही.

जेव्हा पोटातील ॲसिड तोंड आणि पोट यांना जोडणाऱ्या अन्ननलिकेत परत जातं, तेव्हा छातीत जळजळ होते. जेव्हा तुम्ही अन्न गिळता, तेव्हा अन्ननलिकेच्या टोकाशी असलेला भाग, ज्याला अन्ननलिकेचा स्फिंक्टर असंही म्हणतात, ते अन्न आणि द्रव पोटात जाऊ देण्यासाठी सैल आणि घट्ट होत असतं. इकॉनॉमिक टाइम्समधील एका लेखानुसार, हा स्नायू योग्यरित्या कार्य करत नसल्यास पोटातील ॲसिड अन्ननलिकेत वाढू शकतं. ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतं आणि छातीत जळजळ होऊ शकते. सर्वसामान्यपणे छातीत जळजळ होत असताना घाम, चक्कर किंवा थकवा येत नाही. झोपल्यानंतर किंवा जेवणानंतर ही जळजळ अधिक तीव्रतेने जाणवू शकते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे सामान्यत: गॅस होत नाही किंवा ढेकर येत नाहीत.

कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

भारतात गेल्या काही वर्षांत 30-40 वर्षांच्या वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढलंय. ऑक्टोबर 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वसमावेशक वैद्यकीय अभ्यासानुसार, 40 ते 69 वयोगटातील 45 टक्के लोकांच्या मृत्यूचं मूळ कारण हृदयविकाराचा झटका होतं. बहुतेक प्रकरणांमध्ये कमी हालचाल असलेली जीवनशैली आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह हे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. याशिवाय हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरणारे काही सामान्य घटक म्हणजे कोलेस्टेरॉल आणि ट्रान्स फॅटयुक्त आहार घेणं, पुरेशी शारीरिक हालचाल न करणं, जास्त मद्यपान आणि धुम्रपान करणं.

आनुवंशिक आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास, उच्च रक्तदाब, तसंच वायू प्रदूषण, आर्सेनिक, शिसं यांच्याशी अतिप्रमाणात आलेला संपर्क आणि अति उष्णतेमुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

बहुतांश आधुनिक आहारात फास्ट फूड, अति प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेये यांचा समावेश असतो. यामुळे कमी वयातील लोकांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अनहेल्थी लिपिड प्रोफाइल्स अशा समस्या निर्माण होतात. तसंच तंबाखू, ड्रग्ज आणि मद्यपान यांमुळे कमी वयात क्रॉनिक स्ट्रेसची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अभ्यासात असं आढळून आलंय की ज्यांना नैराश्याची समस्या आहे अशा लोकांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगाची शक्यता दुप्पट असते. हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांची काही पार्श्वभूमी नसतानाही नैराश्यग्रस्त लोकांमध्ये इतरांपेक्षा 1.8 पटीने जास्त हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

आणखी एका अभ्यासात मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला आहे. मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याची शक्यता 2-4 पट जास्त असते. उच्च रक्त शर्करा (हाय ब्लड शुगर) ही रक्तवाहिन्यांना नुकसान करते, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी तयार होण्याची शक्यता वाढते आणि ॲथेरोस्क्लेरोसिस होतो.

कोविड 19 मुळे आरोग्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. संशोधकांचा असा अंदाज आहे की कोविड-19 झालेल्या लोकांपैकी 4 टक्के लोकांना हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भारताच्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी अंदाजे 66 ते 70 टक्के लोकांना कोविड 19 ची लागण झाली आहे. मात्र इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अभ्यासाने कोविड 19 प्रतिबंधक लस आणि हृदयविकाराचा झटका यांच्यात कोणताही संबंध असल्याचं नाकारलं आहे.

रेसिडेंट कार्डिओलॉजी तज्ज्ञ डॉ. ओकली यांच्या मते, कमी वयातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं जवळपास नगण्यच असतात. परंतु काही ओळखण्याजोग्या लक्षणांमध्ये थंड घाम येणं, थकवा, डोकं दुखणं, मळमळ आणि उलट्या, शरीराच्या वरच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता, श्वासात अडचण यांचा समावेश होतो. हृदयविकाराच्या समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी नियमितपणे रक्तदाब तपासणं ही पहिली पायरी असू शकते असं डॉक्टर सांगतात.

व्यायाम करताना ही गोष्ट लक्षात ठेवा

शक्यतो आपल्या शरीराला जमेल अशा पद्धतीने आणि शक्य तितकाच व्यायाम करावा. अनेकजण वेगाने चालण्याचा सल्ला देतात. मात्र हा वेग प्रत्येक वयोगटातील व्यक्तीनुसार आणि प्रत्येक शरीररचनेनुसार वेगवेगळा असतो. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक किंवा शरीर पूर्णपणे थकून जाईपर्यंत व्यायाम करू नका.

ताणतणाव आणि अपुरी झोप

सध्याची जीवनशैली पाहता तणाव आणि अपुरी झोप हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग बनला आहे. आरोग्य तज्त्रांच्या मते, अपुरी झोप आणि अधिक ताण हे हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयींबाबतही जागरूक असणं गरजेचं आहे.

(महत्त्वाचे टीप: कोणत्याही प्रकारचे उपचार, व्यायामातील आणि आहारातील बदल हे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.)

गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.