उन्हाळ्यात पाणी कमी पिताय? वेळीच सावध व्हा! डिहायड्रेशनमुळे होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या!
उन्हाळा लागला की घाम आणि तहान वाढतेच! पण धावपळीत आपण खरंच पुरेसं पाणी पितो का? तुम्हाला जाणवत नसलं तरी, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत असू शकते. आणि हा प्रकार वाटतो तितका साधा नाही! उन्हाळ्यात डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं म्हणजे गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देण्यासारखं आहे. वेळीच सावध व्हा आणि जाणून घ्या पाणी कमी प्यायल्याने काय काय नुकसान होऊ शकतं!

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच, शरीरावर घामाच्या धारा वाहू लागतात आणि तहान अधिकच वाढते. या ऋतूत आपल्या शरीराला जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते, पण अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, डिहायड्रेशनचा गंभीर परिणाम होऊ लागतो. डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणे किंवा घसा कोरडा होणे इतकेच नाही, तर यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
पाणी कमी प्यायल्याने होणारे शारीरिक परिणाम
डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणे किंवा घसा कोरडा होणे इतकं नाही. याचे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की :-
थकवा : शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तुमच्या एनर्जी लेव्हल्सवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला नियमित काम करताना किंवा साध्या कामांमध्येही थकवा जाणवू शकतो.
पचनाचे विकार: पाणी कमी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे पोटात दुखणं, गॅस होणं, अपचन, आणि बद्धकोष्ठता यासारखी समस्या निर्माण होऊ शकतात.
डोकेदुखी: शरीरात पाण्याची कमतरता डोकेदुखीला कारण ठरू शकते.
त्वचेवर होणारे परिणाम: पाणी कमी पिण्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि रुक्ष होऊ लागते. यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात आणि तुम्ही वयापेक्षा मोठे दिसू शकता.
उन्हाळ्यात किती पाणी प्यावं?
डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, एका सामान्य व्यक्तीला दिवसाला किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवं. मात्र, उन्हाळ्यात पाणी कमी पिण्याचे धोके अधिक असतात. घामामुळे शरीरात पाणी बाहेर जातं, आणि शारीरिक हालचाली अधिक असलेल्या व्यक्तींना अधिक पाण्याची आवश्यकता असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात, जाणीवपूर्वक पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणं आवश्यक आहे.
डिहायड्रेशन कसं ओळखाल?
- सतत थकवा जाणवणे
- डोकेदुखी
- तोंड कोरडं पडणे
- लघवी कमी होणे किंवा गडद पिवळ्या रंगाची होणे
- त्वचा कोरडी पडणे
- चक्कर येणं
डिहायड्रेशनपासून बचाव कसा कराल?
तुम्ही उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. नियमित अंतराने पाणी पिणं गरजेचं आहे. तहान लागेपर्यंत वाट पाहू नका, पाणी पिऊन शरीराला वेळोवेळी हायड्रेटेड ठेवा. त्यासोबतच, ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा. ह्यामुळे शरीराला पोषण मिळेल आणि पाणी देखील पुरेसं मिळेल.