महायुतीचं सरकारचे काम तीन शिफ्टमध्ये, कोणाच्या शिफ्ट काय? अजित पवारांनी सर्वच सांगितलं
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन केले आणि २० नवीन दवाखान्यांचे उद्घाटन केले. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानला योग्य तो दंड भोगावा असे म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल थेट वक्तव्य केले. तसेच जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
जी घटना घडली यामध्ये संपूर्ण भारत अक्षरशः बदला घेतला पाहिजे, त्यांची जागा दाखवली पाहिजे, निष्पक लोक जातात, भ्याड हल्ले होतात. पंतप्रधानांनी काही निर्णय घेतले आहेत, अशा गोष्टी होता कामा नये. त्याच्या डोक्यामधून हे सगळं आलं त्याला आपली भारतीय सेना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे, असे अजित पवारांनी म्हटले.
सरकार 24 तास जनतेच्या सेवेत
यानतंर अजित पवारांनी या कार्यक्रमात बोलताना आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते, असे म्हटले. “मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे.” असे अजित पवार म्हणाले.
सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड
“राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला हव्यात. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
“सर्व सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवले जातील आणि वीज निर्मिती कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे.” असेही अजित पवार म्हणाले.