Raj Thackeray : अखेर मनसेमध्ये मोठे बदल, अमित ठाकरेंवर राज यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Raj Thackeray : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात महत्त्वाचे बदल केले आहेत. राज ठाकरे यांनी स्वत: मीडियाला आज याची माहिती दिली. मुलगा अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे या दोघांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबईत आज मनसेची महत्त्वाची बैठक झाली. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असे बदल करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. “मुंबईत नव्याने काही पदरचना केलेली आहे. मुंबईत पहिल्यांदाच शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष असेल. आतापर्यंत पक्षात विभागअध्यक्ष पद होतं. एक शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष तीन अशी रचना असेल” असं राज ठाकरे म्हणाले. संदीप देशपांडे यांच्या नावाची राज ठाकरेंनी शहरअध्यक्ष म्हणून घोषणा केली. “कुलाबा ते माहीम-शीव पर्यंत यशवंत किल्लेदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिमेकडचा उपनगरचा भाग कुणाल माईनकर आणि पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्यावर जबाबदारी दिली आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
“त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या? कसं काम करायचं? ते येत्या 2 ताखरेला लेखी स्वरुपात त्यांना सांगितलं जाईल” असं राज ठाकरे म्हणाले. “केंद्रीय समिती नेमली आहे, जी प्रत्येक घटकाकडे बारकाईन लक्ष ठेवेल, संवाद साधेल. बाळ नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय समितीची जबाबदारी आहे. नितीन सरदेसाईंवर विभाग अध्यक्षांची जबाबदारी असेल. अमित ठाकरे शाखाध्यक्षांची जबाबदारी संभाळतील” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई-महाराष्ट्रात अशी रचना कधी?
“या ठाण्यातही अशीच एक केंद्रीय समिती असेल, त्यात अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे, गजानन काळे असतील. यामुळे दोन्ही बाजूने पक्ष बांधला जाईल, अशी रचना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेला हा बदल आहे. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात ही रचना होईल” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
“म्हत्त्वाची जबाबदारी आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. मोठा विश्वास दाखवला आहे. आमचं सर्वात पहिलं काम असेल, मिशन मुंबई. आता लवकरच स्ट्रिम लाइन होईल. मुंबई महापालिका जोरात, जोमात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. नेमणुकांचा विचार हा राज ठाकरे यांनी केला असेल. निश्चितपणे मुंबई महापालिकेत बदल दिसेल. आजपासून मनसे मिशन महापालिका सुरु” असं संदीप देशपांडे म्हणाले.