AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Holi | होळी पेटली पण लाकडांची नव्हे कचऱ्याची! भंडाऱ्यातील गवराळ्यात रंग न उधळता भक्तीत रंगणार गाव

होळीला लाकडं पेटविले जातात. पण, याला अपवाद आहे भंडारा जिल्ह्यातील गवराळा हे गाव. गवराळ्यात काल होळी पेटली पण ती कचऱ्याची. आणि आज धुळवडीला रंग उधळले जाणार नाहीत. भक्ती रंगात गाव न्हाऊन निघणार आहे.

Bhandara Holi | होळी पेटली पण लाकडांची नव्हे कचऱ्याची! भंडाऱ्यातील गवराळ्यात रंग न उधळता भक्तीत रंगणार गाव
भंडाऱ्यातील गवराळा येथे कचऱ्याची होळी पेटविताना नागरिक. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 11:59 AM

भंडारा : सर्वत्र होळीचा सण आनंदाने साजरा केला जात आहे. धुळवडीला रंगाची उधळण केली जाते. लाकडांची होळी पेटविली जाते. पण, भंडाऱ्यातील गवराळा (Gavarala in Bhandara) गाव याला अपवाद आहे. येथे गावात स्वच्छता करून काल कचऱ्याची होळी पेटवण्यात आली. धुळवडीला रंग न खेळता भक्तीसागरात बुडणारे गवराळा हे गाव आहे. लाखांदूर तालुक्यातील गवराळा गावात किसन बाबा अवसरे (Kisan Baba Avsare) महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीत रंग खेळले जात नाही. गावात विविध सामाजिक उपक्रम (Social Activities) राबविले जातात. ही परंपरा या गवराळा गावाने मागील 26 वर्षांपासून अविरत जोपासली आहे.

कोण होते किसन अवसरे महाराज

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेळगाव येथील किशन अवसरे महाराज काही वर्षांपूर्वी गवराळा गावात दाखल झाले. महाराजांनी संपूर्ण जीवन या गावासाठी समर्पित केले. गावात सामाजिक धार्मिक, राजकीय सौख्य राहावे यासाठी महाराज प्रयत्नशील होते. यातूनच अवसरे महाराजांविषयी गावकर्‍यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली. 2 फेब्रुवारी 1992 या रंगपंचमीच्या दिवशी अवसरे महाराजांनी गावात प्रभात फेरी काढली. 500 रुपयांची वर्गणी गोळा केली. दुपारी 12 वाजतानंतर महाराज मंदिरात आले. त्यानंतर मंदिराचे अपूर्ण बांधकाम स्वत: पूर्ण केले. 4.15 वाजताच्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. या घटनेमुळे गावकरी व्यथित झाले. गावकर्‍यांनी कधीही रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय घेतला.

भक्तीरंगात रंगणार गवराळावासी

गवराळ्यात होळीत लाकडाऐवजी केरकचरा, टाकाऊ पदार्थ जाळला गेला. रात्रीला भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. 18 मार्च 2022 रोजी गावात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुबोधदादा भूवैकुंठ अड्याळ टेकडी येणार आहेत. किसन बाबा अवसरे यांचा 29 वा स्मृतिदिन महोत्सव पार पडणार आहे, असे गुरुदेव सेवा मंडळ, हनुमान पंचकमेटी यांनी कळविले आहे. शिवाय गावात रंग उधळले जाणार नाहीत. भक्तीरंगात गाव न्हावून निघणार आहे.

Nagpur Holi Padva | होळीच्या पाडव्याची बात लई न्यारी; चिकन, मटणाचा भाव लई भारी

नागपुरात 27 मार्चला Aeromodelling Show, 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथसंचलन होणार

‘गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवली’, फडणवीसांच्या सत्कारावेळी गडकरींची टोलेबाजी