शिंदे गट आणि भाजप आक्रमक, ‘या’ शहरांमध्ये थेट कार्यकारिणीच रद्द, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
शिंदे गट शिवसेनेची अंबरनाथ आणि उल्हासनगर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर वरिष्ठांनी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. तर नागपुरात भाजपमध्येही अशीच काहीशी कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत जोरदार घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिंदे गट आणि भाजपात तर प्रचंड हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजपने नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत तिथे पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिंदे गटातही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गट शिवसेनेची अंबरनाथ आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार न झालेली कामगिरी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. आता मुलाखती घेऊन नवीन कार्यकारणी निवडली जाणार असल्याची घोषणा कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. अंबरनाथ शहरात तर शिवसेनेची नगरपालिकेवरील एकहाती सत्ता आणि शिवसेनेचेच आमदार असताना देखील खासदार श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. कल्याण लोकसभेतील सर्वाधिक आणि मोठी विकासकामं अंबरनाथ शहरात झाली असतानाही केवळ पक्षांतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका बसल्याने मताधिक्य कमी झाल्याची बाब वरिष्ठांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती.
कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांची मोठी घोषणा
निवडणुकीनंतर झालेल्या आढावा बैठकीतही जाणीवपूर्वक शहरप्रमुखांचा फोटो न टाकल्यानं हा वाद आणखी उफाळून आला होता. त्यामुळे अखेर शिवसेनेची उल्हासनगर आणि अंबरनाथ शहर कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले आहेत. तसेच १८ जुलैला अंबरनाथ शहरात, तर १९ जुलैला उल्हासनगर शहरात नवीन इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर नवीन कार्यकारणी घोषित केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. मात्र या सगळ्या नंतर तरी पक्षांतर्गत गटबाजी कमी होते? की उलट आणखी उफाळून येते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नागपुरात भाजपमध्ये मोठी कारवाई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजप प्रभाग कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभा क्षेत्रात नियुक्त केलेले 370 बूथ प्रमुख, 105 शक्ती प्रमुख, युवा वॉरीयर, पन्ना प्रमुख यांना बरखास्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत मंत्री नितीन गडकरींचे मताधिक्य घटल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप अॅक्शन मोडवर आली आहे. पक्षाने ठरवून दिलेले कार्यक्रम राबविण्यात आणि मतांची टक्केवारी वाढविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे. याच विधानसभा क्षेत्रातून देवेंद्र फडणवीस दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.