Shiv Sena Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण!

आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे.

Shiv Sena Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 17, 2023 | 7:39 PM

नवी दिल्ली : आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहेय. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केलाय. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.

ब्रेकिंग बातमी पाहा LIVE : 

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

या निकालावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे