ऑपरेशन टायगर सुरु, ठाकरे गटाला कोकण आणि छत्रपती संभाजीनगरात पुन्हा खिंडार
दापोली, संभाजीनगर आणि मुंबईतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांनी कोकणात शिवसेनेचा वाढता प्रभाव अधोरेखित केला.

सध्या शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. आता नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजी नगरात उबाठा गटाला खिंडार पडले.
गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला. मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार खोके विकास कामांसाठी दिले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही
“दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहे. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम कोकणात काम करत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मागील पंचवीस वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार
“कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार आहे. काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल”, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर मतदार संघात आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, माजी पंचायच समिती सभापती-राजू मगर, डॉ.राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.