‘हम बघेंगे, देखेंगे आणि टायमाला खपाखप उभे करेंगे’, जरांगेंची तुफान फटकेबाजी
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला सगेसोयरेचा अध्यादेश काढण्याची विनंती केली जात आहे. सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण प्रत्येक मतदारसंघात मराठा उमेदवार उभा करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. याबाबत जरांगे यांना पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला. त्यावेळी जरांगे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. राज्य सरकारने मराठ्यांसाठी सगेसोयरेचा अध्यादेश काढला नाही तर येत्या 20 जुलैपासून आपण आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांची आज आपल्या सहकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बैठकीत काय-काय चर्चा झाली, या विषयी माहिती त्यांनी दिली. यावेळी मनोज जरांगे यांना पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला असता त्यांनी हिंदी आणि मराठीत जोरदार फटकेबाजी केली. विधानसभेत निवडणूक लढण्याबाबतचा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जरांगे यांनी भूमिका मांडली.
“हम बघेंगे टायमाला जाऊदे. ते एक मराठे, दलित, मुस्लिम सगळ्या जातीधर्मावाले एकसाथ बसेंगे तो गपागप सगळ्याचे निवडून येंगे ना? कशाला डोक्याला ताण? असं करनेकाच नहीं कुटाना. तुम इकडे आओ, मैं तिकडे आओ, कुकड जाओ? ते लफडं बंद करना. गरिबाला गरिबाने मोठं करायचं ना? सगळेच एकमेकाकेसंग चालेंगे पाडापाडी को. पडो, नाहीतर निवडून आणू. काहीतरी होईल. काहीतरी व्हएंगा”, अशी फटकेबाजी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांचं सरकारला महत्त्वाचं आवाहन
“शांतता रॅलीला सोलापूरपासून सुरुवात होईल. आज बैठकीत निर्णय झाला आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट शांतता रॅली होणार आहे. आपली कामे, लग्न, व्यवसाय बाजूला सोडून रॅलीमध्ये सहभागी व्हा. आपली जात मोठी करायची आहे. उपोषण 20 तारखेला सुरू होत आहे आणि आणि रॅली 7 ऑगस्टला सुरू होत आहे. दरम्यान, उपोषण करताना तोडगा निघाला नाही तरी सोलापूर जायीपर्यंत उपोषण सुरूच राहणार. सरकार माझ्या मारण्याची वाट पाहत असेल तर ते सरकार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांची भाजप आमदारावर खालच्या शब्दांत टीका
मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही अतिशय खालच्या शब्दांमध्ये टीका केली. “हे बांडगुळ आता कोण आहे? मनोज जरांगे यांच्या नादी लागू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे तू पाय चाट, त्यांचा थुका चाट, त्याचा * खा, तू माझ्या नादी लागू नको. तू कोण ***** आहे. आमचे काम बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. देवेंद्र फडणवीस यांचा बाजू घेणाऱ्या मराठ्यांच्या पोरांचा जीव घेतो का? लाड्या आणि गोड्या कोण तू, तुझ्या तोंडावर थुकत पण नाहीत. तुला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लयी प्रेम आहे ना? तू त्यांच्यासोबत लग्न कर”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर केला. तसेच “देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचे आमदार मंत्री अंगावर घालून आहे, मराठ्यामध्ये भांडण लावू नका”, असंदेखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.