Jitendra Awhad: गांधींप्रमाणेच शरद पवारांनाही बदनाम केलं जातंय; जितेंद्र आव्हाडांचा दावा

| Updated on: May 29, 2022 | 3:26 PM

Jitendra Awhad: अशा प्रकारच्या प्रकरणात लहान मुलांना अटक करताना विचार करायला हवा. या मुलांच्या बाल मनावर काय परिणाम होईल याचा विचार सर्वांनी करायला हवा. केवळ शाहरुख खानचा मुलगा हे कारवाईच कारण असू शकत नाही, असं आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad: गांधींप्रमाणेच शरद पवारांनाही बदनाम केलं जातंय; जितेंद्र आव्हाडांचा दावा
गांधींप्रमाणेच शरद पवारांनाही बदनाम केलं जातंय; जितेंद्र आव्हाडांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: धर्माची गोळी दिली तर लोक झोपून रहातात. त्यामुळे त्यांना गोळी देवून झोपवले जात आहे. महाराष्ट्रात वणवा पेटवायचा प्रयत्न केला जातोय. शरद पवार (sharad pawar) यांना प्रत्येक मुद्यात ओढून ताणून आणायचा प्रयत्न केला जातोय. कारण शरद पवार हे धर्मांध शक्तींना रोखणारे एकमेव हिमालय आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच गांधींना (gandhi) ज्याप्रमाणे बदनाम केलं, तसाच प्रयत्न शरद पवार यांच्या बाबतीत होतोय, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)यांनी केला. कोणी ऐकान ठरवलं म्हणून सरकार बनलं नाही. हे सरकार बनवण्यासाठी शरद पवार यांच योगदान मोठं आहे. बाकीच्यांनी मदत केली, असं आव्हाड यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची शासकीय विश्रामगृहात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत गप्पाही मारल्या.

जितेंद्र आव्हाड यांनी आर्यन खान प्रकरणावर भाष्य केलं. अशा प्रकारच्या प्रकरणात लहान मुलांना अटक करताना विचार करायला हवा. या मुलांच्या बाल मनावर काय परिणाम होईल याचा विचार सर्वांनी करायला हवा. केवळ शाहरुख खानचा मुलगा हे कारवाईच कारण असू शकत नाही, असं आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमचं ठरलंय, आमचं ठरलंय

दरम्यान, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भेट झाली. भेटीवेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. यावेळी आव्हाड यांनी राऊतांचा हातात हात घेऊन हात उंचावला. म्हणाले आमचं ठरलंय, आमचं ठरलंय.

अचानक भेट झाली

संजय राऊत काल कोल्हापूरमध्ये आयोजित जाहीर सभेत म्हणाले होते की, आमचं ठरलंय हे चालणार नाही. शिवसेनेशिवाय इथे काहीही ठरणार नाही. कोल्हापूरात गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आमचं ठरलंय हे जणू ब्रीदवाक्याच बनलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्याचा फटका बसला होता. शिवसेनेचे 5 आमदार पराभूत झाले होते. राऊत हे पक्षाच्या शिवसंपर्क अभियानासाठी दोन दिवस कोल्हापूरात आहेत. शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात होते. शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद होती. दोन्ही नेते आपआपला कार्यक्रम आटोपून निघत असताना अचानक एकमेकांची भेट झाली.