Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला चाप लावावा, पोलिसांची बदनामी करण्याचे बंद करा! काँग्रेसचा इशारा
नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही दंडेलशाही राज्य सरकारने खपवून न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात सध्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या जेलवारीवरून आणि आरोपांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हेही महाविकास आघाडीवर तुटून पडत आहेत. भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही दंडेलशाही राज्य सरकारने खपवून न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
काँग्रेसची भूमिका काय?
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या हे धादांत खोटे आरोप करून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करत आहेत. वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांवरही बिनबुडाचे आरोप करत आहेत. खासदार नवनीत राणा यांना खार पोलीसांनी अटक केल्यानंतर रात्री खार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या व त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. आपली हत्या करण्याचा डाव असल्याचा त्यांचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. आज पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या यांनी गोंधळ घालत पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री यांना आव्हानाची भाषा केली, यावरून आता काँग्रेसनेही सोमय्यांना जोरदार इशारा दिला आहे. त्यामुळे या वादात आता काँग्रेसही तेवढ्याच तीव्रतेने उतरताना दिसून येत आहे.
सोमय्या शांतता बिघडवत आहेत
किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राज्यात अराजक माजवण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सोमय्या सारखे जे लोक राज्यातील शांतता भंग करून वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. दररोज खोटे आरोप करून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. प्रशासकीय कामाकाजात अडथळे आणत आहेत त्यांच्यावर सरकारने सक्तीने कारवाई करावी, असे अतुल लोंढे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हा पॉलिटिकल राडा सुरू आहे. हा वाद काही केल्या संपयाचे नाव घेत नाहीये. आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.