Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला का संरक्षण द्यावं लागतय? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण
"रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण झाला पाहिजे. म्हणून प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तीला एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली. “महाराजांचं मंदिर याकरता, कारण आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करु शकतो. याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचं दर्शन करु शकतो,” असं देवेंद्र फडणवीस मंदिर उद्घाटनाच्या वेळी म्हणाले. “केवळ हे मंदिर नाहीय. ही सुदंर तटबंदी आहे. अतिशय चांगला बुरुज त्या ठिकाणी आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बंगीच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“ज्या काळात या देशातील राजे, रजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकियांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रभू श्रीरामांनी रावणाला चमत्काराने का हरवलं नाही?
“आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती?. त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं. पण ते युगपुरष होते. त्यांना माहित होतं की, जो पर्यंत असुरी शक्तींना संपवण्यासाठी मी समाजाला जागृत करणार नाही, समाजातील कमजोर व्यक्तीच्या मनात शक्ती निर्माण करणार नाही. रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण झाला पाहिजे. म्हणून प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तीला एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा निपात केला. म्हणून एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायच नाहीय’
“तसच छत्रपती शिवरायांनी देखील 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. यात शेतकरी, बलुतेदार, यांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव, देश, धर्मकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायच नाहीय, देव, देश धर्माकरता लढायचं आहे. हे मावळे असे लढले की, खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पस्त करायचे. हे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी काय निक्षून सांगितलं?
“इथे महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. “औरंगजेबाच्या कबरीला ASI ने पन्नास वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं.