‘मुंबईत येताना अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ…’, मनोज जरांगे यांचं महत्त्वाचं आवाहन
"आम्ही मुंबई ची खिंड लढविणार. गावात राहणाऱ्या व्यक्तींनी गावातील खिंड लढवा. मनाने देणाऱ्या लोकांकडून डिझेलचा खर्च केला जाणार आहे. मुंबईला येणाऱ्यांना गावकऱ्यांनी सुका शिधा, किंवा जास्त दिवस टिकेल असे द्या. आपलं लेकरू म्हणून द्या", असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यभरातून मुंबईत आंदोलनासाठी दाखल होताना काय-काय घेऊन यावं, याबाबत मनोज जरांगे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. “महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती आपण आहोत तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं आहे. सर्वांना हात जोडून विनंती घरी राहू नका. नियोजनाचे पीडिएफ बनवून संपूर्ण मराठा बांधवांना देणार आहे. हे सर्व नियोजन लिहिण्यात दोन रात्री घालवल्या. हे सर्व नियोजन स्वतः जरांगे पाटील यांनी दोन रात्र जागून केले”, असं जरांगेंनी सांगितलं.
“मुंबईपर्यंत मी 100 टक्के जाणार आहे. ही वेळ आहे, आपल्या पोरांना मोठं करायची, आपण आहोत तोपर्यंत आरक्षण मिळवून देऊ. कुणीही गट तट ठेवू नका. एवढ्या वेळेस मराठा म्हणून भाऊ म्हणून लढा, ही संधी पुन्हा येणार नाही. सर्व मतभेद सोडून एकत्र या. पाणी आणि इत्यादी मदत लागेल. त्यामुळे मुंबईच्या समाज बांधवांची आम्हाला मदत लागेल. आमची टीम मैदान पाहायला येणार आहे. त्यांच्यासोबत मदतीला यावे. सर्व जाती धर्मातील बांधवानी आम्हाला साथ द्या. रस्त्यामधील जे गाव आहे त्या गावांनी शक्य असेल तर पाणी इत्यादी सोय करा”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.
मुंबईत जाताना ‘या’ गोष्टी घेऊन जा, जरांगेंचं आवाहन
“अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे. आता अविश्वास बंद झाला. या लेकरावर आता समाजाचा विश्वास आहे. आम्ही आरक्षणाच्या दिशेने लवकर पोहोचू. मुंबईत जाताना अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ घ्या. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, ताव, पातेलं घ्या. ऊसतोड करायला चाललो म्हणून सर्व संसार सोबत घ्या. बेसावध होऊन जायचं नाही, सर्व साहित्य सोबत घ्या”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
“तुकडीचे नियोजन केले आहे. या तुकडीतील सदस्यानी त्यांची सोय स्वतः करावी. वाहनालाच घर बनवा. यात्रेत सगळ्या वस्तूनिशी सज्ज राहा. शक्यतो असे दिसते की काहीच करायची गराज राहणार नाही. कारण की अनेक गावे मदतीला येणार असल्याची माहिती कानावर आहे. सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा, शेतीचे कामे आटोपून घ्या. प्रत्येक गाडीत दोन स्वयंसेवक ठेवा, रात्रगस्त करा, कुणाला घुसू देवू नका. लक्ष द्या. यात्रेत कुणीही व्यसन करायचे नाही, नियम मोडायचे नाही. स्वाभिमान वाटला पाहिजे या लढ्याचा मी स्वतः साक्षीदार आहे म्हणून, या लढ्याचे साक्षीदार व्हा”, असं जरांगे म्हणाले.
जरांगे यांचा सरकारला सवाल
“सण-वार नंतर करू, अनेक पिढ्या आहेत सण साजरे करायला. तुमच्या एकजुटीमुळे आतापर्यंत ५४ लाख नोंदी मिळाल्या आहे. हा समाजाचा विजय आहे. सगळेच्या सगळे मुंबईकडे चला. क्युरेटीव्ह पीटिशनचं आरक्षण नाकारत नाही. मात्र ते ओपन कोर्टात होणार आहे का? ते आरक्षण टिकणार का? हे सांगावं”, असं जरांगे सरकारला उद्देशून म्हणाले.
“आम्ही ओबीसी आरक्षणात सरकारला सांगतो कायदा पारित करा आणि आरक्षण द्या, ही आमची पक्की मागणी आहे. आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत म्हणून ठासून सांगतो. एक काम कमी करा, बाहेर पडा, मुंबईला चला. राजकारणी म्हणतील रस्ते बनविले, विकास केला, डांबरी बनविली, मात्र त्यामुळे त्यांचा विकास झाला. आपली मुले तशीच राहिली. मला मुली भेटायला आल्या. धायमोकलून रडल्या, अजून त्यांना नियुक्ती नाही”, असं जरांगेंनी सांगितलं.
‘मुंबईला येणाऱ्यांना गावकऱ्यांनी सुका शिधा द्या’
“आम्ही मुंबई ची खिंड लढविणार. गावात राहणाऱ्या व्यक्तींनी गावातील खिंड लढवा. मनाने देणाऱ्या लोकांकडून डिझेलचा खर्च केला जाणार आहे. मुंबईला येणाऱ्यांना गावकऱ्यांनी सुका शिधा, किंवा जास्त दिवस टिकेल असे द्या. आपलं लेकरू म्हणून द्या. जाणाऱ्यांना वाट लावण्यासाठी सर्व गावकरी वाट लावायला या. शेतकऱ्यापासून श्रीमंत मराठ्यापर्यंत सर्वजण सामील व्हा”, असं आवाहन जरांगेंनी केलं.