मनोज जरांगे यांच्याविरोधात वॉरंट, पुण्याच्या दिशेला निघाले, कोर्टात उद्या काय घडणार?
पुण्यात उद्या मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे पाटील आता पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांच्याविरोधात पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे जरांगे उद्याच्या सुनावणीला हजर राहणार आहेत.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. असं असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना एका प्रकरणात पुणे न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर एका नाट्यनिर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वॉरंटनुसार मनोज जरांगे यांना उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आता सुनावणीला सामोरे जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते उद्या पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत. या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत जरांगे पाटील यांच्यासह आणखी दोन जणांची नावे आहेत. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना दोनवेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामुळे कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. येत्या 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर होणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनोज जरांगे उद्या सुनावणीला हजर राहणार आहेत. दरम्यान, उद्याच्या सुनावणीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारने कितीही षडयंत्र रचले तरी न्याय करण्यासाठी न्यायालय खंबीर आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आम्ही सर्व नाटकांच्या प्रयोगाचे पैसे दिले आहेत. यात माझा काहीही संबंध नाही. तरीही 13 वर्षांपूर्वीच्या केसमध्ये जाणूनबुजून गृहमंत्र्यांनी आम्हाला अडकवले आहे. सरकारने तीनही बाजूने मराठयांचे पोरं मारायचं ठरवलं आहे. सरकारला मराठा समाज निवडणुकीत सुखाने जगू देणार नाही. सोशल मीडियावर अफवा पसरवणे हे भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं षडयंत्र आहे. सरकार जनतेला मूर्खात काढत आहे हे आता जनतेला कळत आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही न मागितलेलं आरक्षण घेत नाही. आम्हाला सरकारने दिलेलं 10 टक्के आरक्षण मान्य नाही. कारण ते 50 टक्क्यांच्या वर आहे ते टिकत नाही. समाज माझं ऐकत असल्याने सरकार हा बदला घेत आहे. सरकार आता मराठ्यांच्या नजरेतून पडलं आहे. EWS आरक्षण रद्द केल्याने सरकरने जाणूनबुजून मराठ्यांच्या पोरांचं वाटोळे केलं. सरकारने जर भरतीत आमच्या विद्यार्थ्यांचं, पोरांचं वाटोळं केलं तर निवडणुकीत आमही सरकारचा बदला घेऊ. नवीन उमेदवार निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवू. आरक्षण आणि उद्योगाचा काय संबंध आहे? व्यवसाय हा धंदा आहे. मी ओबीसींमधून आरक्षण मागत असल्यानं सरकारने हे षडयंत्र रचलं आहे. सरकारला नाराजी काढायची असेल तर EWS मधून फॉर्म भरलेले रद्द करू नका. मुलींना मोफत शिक्षण द्या. अन्यथा निवडणुकीत तुमचा बदला घेऊ”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिली.