Nitesh Rane : ‘त्यांनी जय शिवराय नाही, अल्लाहू अकबर बोला’, नितेश राणेंनी कुठल्या पक्षाबद्दल हे म्हटलं?
Nitesh Rane : "बाबरी मशीद तोडत असताना आपण त्या वेळी एकमेकांना जास्त विचारत बसलो नाही. सरकारने योग्य भूमिका घेतली. त्याचीच पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे. समजने वालो को इशारा काफी" असं नितेश राणे म्हणाले.

“आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे, ती आठवण आम्हाला नको आहे. ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपविले, त्याची कबर कशाला हवी?. काहीना ती आठवण वाटते, मात्र ती घाण आम्हाला नको आहे. अशी कोणतीच चिन्हे नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभी राहिली, ती घाण नको. ज्यांना आठवण वाटते, त्यांनी पाकिस्तान मध्ये घेऊन जावं” असं मंत्री नितेश राणे म्हणाले. फोन आल्यावर जय शिवराय बोला या भूमिकेवरुन नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कडक शब्दात सुनावलं. ‘फोन उचलल्यानंतर अल्लाहू अकबर म्हणा’ मंत्री नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं. “ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो, त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराज बोलू नये राँग नंबर बोलून फोन ठेवायला लागेल” अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना नितेश राणेंनी सुनावलं.
“हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची तिथी प्रमाणे आज शिवजयंती साजरी होते आणि आज मी माझ्या राजासमोर नतमस्तक होण्यासाठी आलोय. सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही, कोणता आमदार म्हणून नाही पण एक शिवभक्त म्हणून आवर्जून शिवनेरीला उपस्थित राहिलो” असं मंत्री नितेश राणे म्हणाले. “जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तरी आपण शिवरायांच्या महाराष्ट्रमधून आलो हे अभिमानाने सांगतो. तिथी नुसार जयंती साजरी करण्यासाठी योग्य माणूस खुर्चीवर बसणारा पाहिजे आणि आता फडणवीस हे बसले आहेत. जे शिवभक्तांच्या मनात आहे, तो प्रत्येक शब्द फडणवीस पूर्ण करतील” असं नितेश राणे म्हणाले. “माझ्या हातात आजच्या कार्यक्रमाची पत्रिका पडली आणि मी कोणताही विचार न करता होकार दिला. आज 12 वाजता विधी मंडळात माझ्या नावाचा प्रश्न आहे. दोन-तीन दिवस माझ्याच नावाने बोंबाबोंब सुरू आहे, आणि मी तिथे पोहचलो नाही तर बोंबलणाऱ्यांना अजून ताकद मिळेल” असं नितेश राणे म्हणाले.
‘राजांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता हे छातीठोकपणे सांगतो’
“तिथे गेल्यावर सगळी औषधे माझ्याकडे आहेत, त्यांना गप्प करण्यासाठी. मी एकदा बोललो की बोललो. माझा शब्द बंदुकीच्या गोळीसारखा आहे. इतिहास चार पाच टकल्यांना कळतो. आम्हालाही इतिहास समजतो. आम्हाला माहिती देणारे सुद्धा आहेत” असं नितेश राणे म्हणाले. “ब्रिटिशांनी आमच्या राजाचा उल्लेख हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला” असं नितेश राणे म्हणाले. “आदिलशहानी अफजल खानाला राजावर आक्रमण करण्यासाठी का पाठवलं? आदिशहाने फर्मान काढलेलं, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की, छत्रपती शिवराय यांच्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माची वाढ खुंटली. सगळे याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आज ही सांगतो, राजांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता हे छातीठोकपणे सांगतो” याचा पुनरुच्चार नितेश राणे यांनी केला.
मग संभाजी राज्यांचा छळ का झाला?
“राजांचा इतिहास पुढच्या पिढीला चुकीचा जाऊ नये, ही शपथ घेऊन इथून बाहेर पडलं पाहिजे. पुढच्या वेळी इथे जास्त वेळासाठी येईन. इथे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्तोत्र आहेत. एवढ्या वर्षानंतर छावा चित्रपट आलाय आणि हा पाहिल्यानंतर कळलं की आपला इतिहास काय आहे. या चित्रपटामुळे आपला इतिहास भावी पिढीला कळतो तरी आहे. स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात नव्हती तर मग संभाजी राज्यांचा छळ का झाला?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
मरेपर्यंत हिंदू असेन
“संभाजी महाराज यांचा फक्त धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. इथे शिवनेरी गडावर आल्यानंतर काही गोष्टी खटकल्या. काही जिहादीनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी अतिक्रमण करून ठेवले आहे, असं माझ्या कानावर आलेलं आहे” असं नितेश राणे म्हणाले. “आज आपल्या विश्व हिंदू परिषदेने आपल्या हिंदुत्ववादी संघटनेने औरंग्याच्या कबरीबद्दल एक हाक दिलेली आहे. आज महत्त्वाचा दिवस आहे, त्या संदर्भात मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती थोबाड उघडू शकतो मला मर्यादा आहे. पण तुम्हाला माहिती आहे कुठेही असलो तर आज मंत्री आहे उद्या नाही पण मरेपर्यंत हिंदू असेन हे लक्षात ठेवून मी काम करतोय. प्रत्येकाने आपल आपलं काम करावं. सरकार म्हणून आम्ही आमचे काम करतो, तुम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून तुम्ही तुमचं काम करा” असं नितेश राणे म्हणाले.