Raj Thackeray : ‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई…’ निकालानंतर राज ठाकरेंचा RSS च्या माणसासोबत काय संवाद झाला?
Raj Thackeray : "या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलय पण ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. तुम्ही असं कुठेही मनात धरु नका, लोकांनी मतदान केलं पण त्यांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं" असं राज ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले.

“निवडणुकीचा निकाला लागल्यावरती, ज्या दिवशी निकाल लागला महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा पसरला. हे पहिल्यांदा मी बिघतलं. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता. असा निर्णय कसा आला. माझ्याकडे आरएसएसशी संबंधित एक व्यक्ती आलेली, मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही. ते छान वाक्य बोलले, मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू हैं भाई, कोई तो जीता होगा” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच बोलले. वरळी येथे पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.
“महाराष्ट्राच सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे? काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. राजू पाटील यांचं एक गाव आहे, पाटलांच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होतं. 1400 लोकं त्या गावात राहतात. त्यांना किती मत मिळाली. अख्ख्या गावाच मतदान त्यांना होतं. त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळाल नाही. अख्ख्या गावातून एक मत नाही पडलं, जी 1400 मतं राजू पाटील यांना मिळायची, तिथे एक मत मिळत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.
त्यांना शॉक बसलाय
“मराठवाड्यात एक पदाधिकारी नगरसेवक आहे, नगरसेवक झाला त्यावेळी त्या भागातून साडेपाच हजारच मतदान आहे. आता तो विधानसभेला उभा होता, त्याला त्या वॉर्डात विधानसभेला अडीच हजार मतदान झालं. अनेक असे निर्णय आहेत, ज्यावर निवडून आलेल्यांचा विश्वास बसत नाहीय. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, ही आठवी टर्म होती. सातवेळा जे 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून यायचे, या निवडणुकीला त्यांचा 10 हजार मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून बोलतायत, मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतय जे निवडून आलेत, त्यांचे अनेकांचे फोन आले. त्यांना शॉक बसलाय” असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवारांचे 42 आमदारा कोणाचातरी विश्वास बसेल का यावर?
भाजपाला 132 जागा मिळाल्या. मागच्यावेळी 105 त्याच्याआधी 2014 साली 122 जागा मिळालेल्या समजू शकतो आपण. पण अजित पवार यांच्या 42 जागा येतात, ज्यांच्या चार-पाच जागा येतील अस सगळ्यांना वाटत असताना त्यांच्या 42 कोणाचातरी विश्वास बसेल का यावर? ज्यांच्या जीवावर हे राजकारण करत आले, त्या शरद पवारांना फक्त 10 जागा मिळतात हे न समजण्यापलीकडे आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
हा संशोधनाचा विषय
“लोकसभेला सर्वात जास्त 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले. एका खासदारामागे 5 ते 6 आमदार असतात. सर्वच्या सर्व सहा नाही, पण तीन-चार आमदार. त्या काँग्रेसचे किती आमदार आले 15. शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले, त्यांचे 10 आमदार येतात. लोकसभेला अजित पवारांचा एक खासदार निवडून आला, त्यांचे 42 आमदार येतात. चार महिन्यात लोकांच्या मनात असा काय फरक पडला? हा संशोधनाचा विषय आहे” असं राज ठाकरे म्हणाले.