…तर वाईट परिणाम होतील, लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचा इशारा काय?
लाडकी बहीण योजनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला आहे. ही योजना स्वार्थासाठी आहे का ?, जानेवारीत कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
लाडकी बहीण योजनेवरुन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निशाणा साधला आहे. राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजना स्थार्थासाठी आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. लाडकी बहीणसारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम होतील. स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत. जानेवारी महिन्यात राज्याची तिजोरी रिकामी होईल. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. शेतकऱ्यांची वीज मोफत मागितलेली नाही मग फुकट कशाला देता ?
महाराष्ट्राचं बजेट किती?
कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही जानेवारीत पैसे नसतील अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली. 2024-25 चं महाराष्ट्राचं बजेटनुसार राज्याचं महसुली उत्पन्न आहे, 4 लाख 98 हजार 758 कोटी आणि महसुली खर्च आहे 5 लाख 8 हजार 492 कोटी. सध्याच महसुली तूट आहे, 9 हजार 734 कोटींची. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्जाच्या व्याजापोटी सरकारचा खर्चच होतो 53 टक्के. म्हणजेच 2 लाख 64 हजार 341 कोटी रुपये खर्च होतात आणि भांडवली तसंच इतर खर्च आहे 47 % म्हणजेच 2 लाख 34 हजार 416 कोटी रुपये. म्हणजेच पैसे जसे येतात तसे खर्च होत आहेत, उलट उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 47 हजार कोटी एवढा पैसा लागणार आहे.
योजनेवरुन प्रचार
लाडकी बहीण योजना, हा सरकारच्या प्रचाराचा भाग झालेला आहे. अजित पवारांनी तर कॅम्पेनच सुरु केलं आणि सरकारनंही लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत प्रचार सुरु केला. त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर, वाईट परिणाम होतील असं राज ठाकरे म्हणालेत. मात्र लाडकी बहीण योजना विचारपूर्वकच आणली असून पैशांचं नियोजन केलेलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी TV9च्या कॉनक्लेव्हमध्ये सांगितलेलं आहे.
येत्या 10 ऑक्टोबरला, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊ शकते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेसाठी 9 कोटी 53 लाख मतदार मतदान करणार आहेत. पुरुष मतदारांची संख्या आहे, 4 कोटी 93 लाख आणि महिला मतदारांची संख्याही 4 कोटी 60 लाख इतकी आहे. म्हणजेच महिला मतदारही पुरुष मतदारांऐवढ्याच आहे. आणि ही संख्या निर्णायक ठरणार आहे.
मात्र प्रणिती शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला टोला लागवला. नवऱ्याचे पैसे घेवून बायका ऐकत नाही, सरकारचं काय ऐकणार असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल अशी आशा सरकारला आहे. पण पैसे कुठून आणणार असा सवाल आतापर्यंत महाविकास आघाडी करत होती. आता राज ठाकरेंही तोच सवाल केला आहे.