भाजपकडून किरीट सोमय्या यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न, पक्षाने दिली मोठी जबाबदारी
भाजप नेते किरीट सोमय्या यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत. यासाठी किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांचे अभिनंदन केले आहेत.
भाजप पक्षाकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपकडून किरीट सोमय्या यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमय्या यांच्यावर मुंबई एमएमआर भागातील मतदार एकत्रिकरण अभियानाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेलमधील मतदारांच्या एकत्रिकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत किरीट सोमय्या यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक समितीत न विचारता सहभागी केल्याने सोमय्या यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी विरोधकांच्या विरोधात मोर्चाच काढला होता. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली होती. त्यांनी तत्कालीन सरकारमधील अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे कथित घोटाळे बाहेर काढत आरोप सुरु केले होते. त्यांच्या आरोपांनंतर अनेक नेत्यांना ईडी, सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. पण सत्तांतरानंतर किरीट सोमय्या यांना अडगळीत पडल्यासारखं झालं होतं, अशी चर्चा होती.
मधल्या काळात किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच पक्षाकडूनही त्यांना लोकसभेत संधी न देण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांना पक्षाने विधानसभा निवडणूक प्रचारक समितीत सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती. पण यावर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला न विचारता प्रचारक समितीच्या यादीत नाव टाकल्याने त्यांनी पत्रात नाराजी व्यक्त करत संबंधित जबाबदारी नाकारली होती. त्यामुळे किरीट सोमय्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यानंतर आता भाजप पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.