‘उद्धव ठाकरे यांच्या आरोपांनंतर तुम्ही त्यांच्या पक्षालाच संपवलं?’, देवेंद्र फडणवीस म्हणाले….

| Updated on: Jun 29, 2023 | 8:50 PM

देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात पुन्हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांच्या आरोपांनंतर तुम्ही त्यांच्या पक्षालाच संपवलं?, देवेंद्र फडणवीस म्हणाले....
Uddhav Thackeray-devendra fadnavis
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला होता. भाजप पक्ष हा विरोधी पक्षांना संपवत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. विशेष म्हणजे आपण उद्धव ठाकरे यांचं ते बोलणं खरं करुन दाखवलं, असा दावा केला जातो. यावर तुम्ही काय म्हणाल? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डीडी वाहिनी’च्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.

“राजकारणात कोणताच व्यक्ती कोणत्याही पक्षाला संपवू शकत नाही. पक्ष समाप्त होतात ते आपल्या कर्तृत्वामुळे, पक्ष समाप्त होतात जेव्हा जनता तो पक्ष आवडत नाही. जनतेचं प्रेम असेल तर कोणताच पक्ष संपू शकत नाही. कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो पक्ष संपू शकणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, विरोधी पक्षातले कोण एकत्र येत आहेत? जे कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात फसले आहेत ते एकत्र आले आहेत. ते देशाच्या सेवेसाठी एकत्र येत नाहीयत. तर सरकारमधून मोदींना हटवलं तर आधीसारखं करता येईल. यासाठी दुसरा कोणताही अजेंडा नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘शरद पवार राष्ट्रवादीचे मालक, अजित पवार नाहीत’

“शरद पवार यांची भूमिका पक्की आहे. ते पक्षाचे मालक आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते त्यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार पक्षाचे मालक नाहीत. शरद पवार आहेत. शेवटी हे सर्व प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहेत ना? ठाकरे गटाचे मालक उद्धव ठाकरे आहेत. राष्ट्रवादीचे मालक शरद पवार आहेत. याशिवाय इतर विरोधी पक्षाचे मालकही तेच आहेत. मुलायम सिंह यांचे मालक त्यांचे पुत्र आहेत. लालूप्रसाद मालक आहेत. आमच्या पक्षात कुणीच मालक नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार का?

“मी खूप प्रॅक्टिकल बोलतोय. राजकारणात कोणतीच गोष्ट कायमस्वरुपी नसते. परिस्थिती अनेक गोष्टी स्पष्ट करते. पण मी जेवढं राजकारण मला समजतं त्यानुसार मला वाटत नाही की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ किंवा शरद पवार आमच्यासोबत येतील. या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. आमचे तत्व आहेत. आम्ही २२ पक्षांसोबत सरकार चालवलं आहे. पण आम्ही काँग्रेस, एमआयएम, मुस्लीम लीग सारख्या पक्षांसोबत जाऊ शकत नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

“उद्धव ठाकरेंना जो धोका दिला त्याबद्दल मनात दु:ख आहे. ते सोडून द्या. माझ्या दु:खाने पक्ष चालत नाही. तर वास्तविकतेवर चालतो. पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत जायचं नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.