Mumbai AC Local : मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! शुक्रवारपासून धावणार आणखी 10 एसी लोकल
Mumbai Local News : वाढलेल्या एसी लोकलच्या फेऱ्या या 19 ऑगस्टपासून चालवल्या जाणार आहेत. नव्या दहा एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे आता एसी लोकलची संख्या 66 वर पोहोचली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेनं मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतलाय. एसी लोकलला (Mumbai AC Local) मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने एसी लोकलच्या (Mumbai Local Trains News) संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत (Central Railway) मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर 10 नव्या एसी लोकल धावणार आहेत. सध्या सुरु असलेल्या सामान्य लोकलच्या जागी 10 एसी लोकल रिप्लेस केल्या जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता ऐन पावसात मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान, या एसी लोकल रविवारी चालवल्या जाणार नाही. ठाणे-सीएसएमटी अप आणि डाऊन तसंच कल्याण-सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावर या लोकल चालवल्या जाणार आहेत. नव्याने चालवल्या जाणाऱ्या दहा लोकलपैकी आठ लोकल या फास्ट ट्रॅकवरुन चालवल्या जाणार आहेत. तर फक्त दोन लोकल या स्लो ट्रॅकवरुन चालवल्या जाणार आहेत. एससी लोकलची वाढती प्रवासी संख्या पाहता मध्य रेल्वे प्रशासनाकडून लोकलच्या फेऱ्याही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
19 ऑगस्टपासून धावणार..
वाढलेल्या एसी लोकलच्या फेऱ्या या 19 ऑगस्टपासून चालवल्या जाणार आहेत. नव्या दहा एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे आता एसी लोकलची संख्या 66 वर पोहोचली आहे. दरम्यान, आता वाढवण्यात आलेल्या नव्या 10 लोकल रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालवल्या जाणार नाहीत, असंही मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अशा असतील लोकल फेऱ्या :
- 1 ठाणे ते सीएसएमटी – फास्ट लोकल : सकाळी 8.20 (अप-डाऊन)
- 2 ठाणे ते सीएमसएमटी – स्लो लोकल – दुपारी 4.12 (अप-डाऊन)
- 3 सीएसएमटी ते ठाणे – फास्ट लोकल – रात्री 8.30 (अप-डाऊन)
- 4 ठाणे ते सीएसएमटी – स्लो लोकल – दुपारी 3.02
- 5. कल्याण सीएसएमटी – फास्ट लोकल – दुपारी 12.25 आणि दुपारी 1.36
एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात कपात केल्यापासून एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यायचं पाहून हार्बर मार्गावरील एसी लोकलही मध्य रेल्वे प्रशासानाने बंद केल्या होत्या. त्यानंतर या लोकल मध्य रेल्वे मार्गावर चालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता वाढत असलेल्या प्रवासी संख्येत आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळतंय.