‘अजित पवारांनी मिश्या काढल्या नाहीत, आम्ही वस्तरा पाठवायचा का?’, मेहबूब शेख यांची खोचक टीका
"अजित पवारांनी बारामतीत भाषण केलं होतं. त्या भाषणात अजित पवार म्हणाले होते की, आता जे भावंड माझ्या प्रचारात दिसत आहेत ते 7 तारखेच्या नंतर दिसणार नाहीत. दिसले तर मी माझ्या मिश्या काढेन. पण अजित पवार यांनी अजून मिश्या काढल्या नाहीत. मग वस्तरा आम्ही पाठवायचा का?", असा खोचक टोला मेहबूब शेख यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी फोन केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गेले नाहीत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांना शरद पवार गटाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “छगन भुजबळ हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करु नयेत. मुळात भुजबळांनी शिवसेना का सोडली? तर मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. त्यामुळे त्यांची साथ देण्यासाठी त्यांनी शिवसेना सोडली ना? मग शरद पवार हे ओबीसींच्या विरोधात कसे? शरद पवार यांचा राग भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर नाही. तर या दोन नेत्यांवरच लोकांचा राग आहे”, असं मेहबूब शेख म्हणाले. यावेळी मेहबूब शेख यांनी अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजची आठवण करुन देत, आपण अजित पवार यांच्या मिशी कापण्याची वाट पाहत असल्याची टीका केली. “अजित पवार यांना वस्तरा आम्ही पाठवायचा का? की त्यांना वस्तरा मिळतंच नाही?”, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला आहे.
“मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी मनोज जारंगे पाटील हे लढत आहेत. मग त्यांना जेव्हा सरकारी मंत्री भेटायला जातात तेव्हा हे मंत्री विरोधकांना सुद्धा घेऊन भेटायला का जात नाही? आणि जरांगे पाटील यांना कोणता शब्द हा सरकारकडून दिला गेला आहे? यापूर्वी जेव्हा सर्वपक्षीय बैठक आरक्षणच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी घेण्यात आली होती त्यात काय झालं? तोडगा निघाला का? या सरकारला फक्त दोन समाजात भांडण लावून निवडणुका लढवायच्या आहेत”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला.
‘लाडकी बहिण म्हणजे काय असते? ते आता समजलं असेल’
“अजित पवार यांची आज जनसन्मान सभा झाली. ही सभा अजित पवार यांच्या मलिदा गँगची होती आणि या सभेला सर्व मलिदा गँगचे लोक आले होते. अजित पवार यांना आज लाडकी बहीण योजनेची आठवण आली आहे. त्यांना आता समजलं असेल ना, लाडकी बहिण म्हणजे काय असते? आणि आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं त्या योजनेचं नाव आहे. त्यातून आज मुख्यमंत्री नाव काढून का टाकण्यात आलं?”, असा सवाल मेहबूब शेख यांनी केला.
मेहबूब शेख यांचा अजित पवारांना टोला
“अजित दादा काय ते शब्दाचा पक्का असं बोलत होते. याच अजित पवार यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत श्रीनिवास बापू यांचं आव्हान स्वीकारलं होतं. त्यांनी मिशी कापण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. त्यामुळे आता अजित दादा ते चॅलेंज कधी पूर्ण करतात याची मी वाट बघत आहे. अजित दादांनी मिशा काढल्या नाहीत, मग वस्तरा आम्ही पाठवायचा का?”, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला.
मेहबूब शेख नेमकं काय म्हणाले?
“अजित पवारांनी बारामतीत भाषण केलं होतं. त्या भाषणात अजित पवार म्हणाले होते की, आता जे भावंड माझ्या प्रचारात दिसत आहेत ते 7 तारखेच्या नंतर दिसणार नाहीत. दिसले तर मी माझ्या मिश्या काढेन. पण अजित पवार यांनी अजून मिश्या काढल्या नाहीत. मग वस्तरा आम्ही पाठवायचा का? की अजित पवार यांना वस्तरा मिळतंच नाही? कारण आता युगेंद्र पवार असतील, श्रीनिवास बापू असतील, शर्मिला पवार असतील, सुनंदा पवार असतील, शरद पवार स्वत: असतील, सुप्रिया सुळे असतील, सर्व पवार कुटुंबिय बारामतीत रोज फिरतंय”, असं मेहबूब शेख म्हणाले आहेत.
“अजित पवार हे सुद्धा बोलले होते की, माझा लोकसभेत उमेदवार निवडून दिला नाही तर मी विधानसभा सुद्धा लढणार नाही. मग आत्ता तुम्ही लढणार का बारामतीची विधानसभा? दादा जर शब्दांचा पक्का आहे ना, मग त्यांनी हे दोन शब्द जे जनतेला दिले होते त्याचं पालन त्यांनी करावं. तेव्हाच मी त्यांना शब्दाचा पक्का आहे असं म्हणेन”, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली.