ठाकरे गटासोबत ठासणी झाली, बोलणी झाली… पण दोन भटजी आडवे आले; प्रकाश आंबेडकर यांचा कुणावर निशाणा?

| Updated on: Oct 02, 2023 | 3:07 PM

आम्ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहोत. इंडिया आघाडीशी आमचा संबंध नाही. राज्यात भाजपला हरवायचं आहे हे आम्ही पक्कं केलंय. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं तर आमची शिवसेनासोबत जागा वाटपाची बोलणी सुरू होईल...

ठाकरे गटासोबत ठासणी झाली, बोलणी झाली... पण दोन भटजी आडवे आले; प्रकाश आंबेडकर यांचा कुणावर निशाणा?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाशी जागा वाटपाची चर्चा करता येत नाहीये. त्यामुळे वंचितमध्ये अस्वस्थता आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जागा वाटप लवकरात लवकर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकाही केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आमची ठासणी झाली. बोलणी झाली. पण लग्नाची तारीख काढायला दोन भटजी आडवे येत आहेत. एकाचं नाव आहे काँग्रेस. दुसऱ्याचं नाव आहे एनसीपी. दोन्हीही पक्ष आपसात तडजोड करत नाहीत. शिवसेनेसोबतही बोलणी करत नाहीत. त्यांनी भिजत घोंगडं ठेवलं आहे. त्यांनी घोंगडं भिजत का ठेवलंय हेही सांगत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हवी तर धमकी समजा

महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा होत नाही. त्यामुळे कोण कुणासाठी काम करतोय याबाबत शंका वाटते. मी आज शंका घेत नाही. पण वेळ येईल तेव्हा शंका घेऊ, ही हवं तर धमकी समजा. तुमची युती होणार असेल तर युती होणार सांगा आणि सीट वाटप करून घ्या. सीट वाटप केलं नाही तर आम्ही उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू. यांच्यासोबत जायचं की नाही जायचं हे ठरवा, असं उद्धव ठाकरे यांना सांगू. प्रेशर टाकून युती करू, असं त्यानी स्पष्ट केलं.

तोपर्यंत शिंदे गटासोबत नाही

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत एकनाथ शिंदे गटासोबत बोलणी करणार नाही. आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं प्रकाश आंबडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी ट्रायलवर

राहुल गांधी निर्णय घेऊ शकत नाही. हे स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी यांनी मुंबईच्या इंडिया आघाडीत अदानीवर भूमिका घ्या असं सर्व पक्षांना आवाहन केलं होतं. भूमिका घेतली की नाही माहीत नाही. पण शरद पवार हे अदानीसोबत आहेत हे स्पष्ट झालं आहे. आता राहुल गांधी यांना ठरवावं लागेल.

अदानी हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी देश लुटला आहे. त्यांना टार्गेट करणं काँग्रेसची भूमिका आहे. पण शरद पवार ही भूमिका वठवतानादिसत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी विरोधात निर्णय घ्यावा. निर्णय घेतला नाही तर त्यांच्यात ती क्षमता नाही असं स्पष्ट होईल. राहुल गांधी यांनी अदानीच्या प्रकरणात स्वत:ला ट्रायलवर ठेवलं आहे, असंही ते म्हणाले.

हे हुकूमशाहीचं द्योतक

बाबासाहे आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रत्येक कलमात सेक्यूलरचा अंतर्भाव केला आहे. फंडामेंटल ड्यूटीस आहेत. तो समाजवादाचा भाग आहे. तो कधी तरी शासनाला अमंलात आणावा लागणार आहे. आता रिसोर्सेस नसल्याने हे कर्तव्य ऐच्छिक ठेवले आहेत. पण नंतरच्या काळात ते कंपल्सरी होतील. इंदिरा गांधींनी दोन शब्द टाकले. जनतेने मान्य केलं. आता ते काढले हा लहरी कारभार आहे. हे हुकूमशाहीचं द्योतक आहे, अशी टीका त्यांनी केली.