ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, पडद्यामागे हालचालींना वेग, मोठं काहीतरी घडतंय?

| Updated on: Sep 06, 2023 | 4:03 PM

राज्यपालांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली.

ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, पडद्यामागे हालचालींना वेग, मोठं काहीतरी घडतंय?
Follow us on

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळातील अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

“जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात 1 तारखेला मराठा समाजाच्या गावकऱ्यांवर माता-बघिणी, लहान मुलांवर, वृद्धांवर अमानुष लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला? मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला? कुणीही स्वीकारत नाही. प्रशासनाने स्वत: हा एवढा मोठा निर्णय घेतला? ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी आमच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्यपालांची भेट घेतली”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

‘गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे’

“पोलिसांनी 350 गावकऱ्यांना मारलं. पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली. सगळ्यात आधी यांच्यावर कारवाई करावी. एसपी यात जबाबदार असतील तर त्यांना बडतर्फ करावं, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली”, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

“राज्याचे गृहमंत्री एकीकडे माफी मागतात. गोवारी हत्याकांडाचं उदाहरण देतात. गोवारी हत्याकांड जेव्हा झालं होतं तेव्हा राज्याचे तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. म्हणून आम्ही आज मागणी करतोय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी सुस्पष्ट मागणी आम्ही केली आहे. सारथीसाठी 2200 कोटी दिले, अशी घोषणा केली. पण मी माहिती काढली तर फक्त 34 कोटी आतापर्यंत देण्यात आले आहेत”, असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “जालन्यात मंदिराच्या बाजूला उपोषण सुरु होतं. तिथे हरीपाठ सुरु होता. सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून लाठीचार्ज केला गेला. लाठीचार्ज करण्याची गरजही नव्हती. अशा महत्त्वाच्या विषयी आंदोलन सुरु असेल तर पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्ज करत नाहीत हे मी तुम्हाला खात्री पटवून देऊ शकतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.