दिवसा ऑक्टोबर हिट, रात्री मुसळधार, राज्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

| Updated on: Oct 20, 2024 | 1:58 PM

rain in maharashtra: नाशिकच्या चांदवड शहर व परिसरात परतीचा ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी रात्री सुमारे दोन तास पाऊस कोसळत होता. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावर गुडघ्या येवढे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चार चाकी वाहने पाण्यात गेली.

दिवसा ऑक्टोबर हिट, रात्री मुसळधार, राज्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान
चांदवडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान
Follow us on

rain in maharashtra: महाराष्ट्रातील विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिक घेत आहेत. दिवसा ऑक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे. त्यानंतर रात्री मुसळधार पावसाचा अनुभव घेत आहे. या पावसामुळे राज्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पाऊस पडत आहे. राज्यात पुढील तीन, चार दिवस पावसाचा यलो अलर्ट दिली आहे.

नाशिकच्या चांदवड शहर व परिसरात परतीचा ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी रात्री सुमारे दोन तास पाऊस कोसळत होता. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावर गुडघ्या येवढे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चार चाकी वाहने पाण्यात गेली. आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसले. या भागातील काही जनावरे वाहून गेले. प्रशासनाच्यावतीने मदत कार्य सुरू आहे. त्याचबरोबर राहूड भागात जोरदार पाऊस झाल्याने राहुडच्या बंधाऱ्याचे धोक्याची पातळी गाठली. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे, काढणीला आलेला मका, कांदा, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. बांधरा आणि पाझर तलाव फुटल्यामुळे पिकासह शेती वाहून गेली.

हे सुद्धा वाचा

छत्रपती संभाजी नगरात मुसळधार

छत्रपती संभाजी नगर शहरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मुकुंदनगर भागात अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. शहरासह जिल्हाभरात देखील मागील तीन ते चार दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान सुरू आहे. सोयगाव सिल्लोड भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. कापूस, मका आणि सोयाबीन हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.

भंडाऱ्यात धानपीकाचे नुकसान

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी, बेटाळा, भंडारा तालुक्यातील मानेगाव सह लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळवारा सुटला. हलका पाऊस देखील पडल्याने कापणीयोग्य धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे वारंवार नुकसान सोसणारा धान उत्पादक शेतकरी पुन्हा धास्तावला आहे. बहुतेक शेतकऱ्यांचे धान या वादळी वाऱ्यासह पावसाने जमीनदोस्त झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

अमरावती जिल्ह्यात दोन ठार

अमरावतीत जिल्ह्यात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वीज पडून दोन ठार तर पाच महिला जखमी झाल्या. चिखलदरा व तिवसा तालुक्यात वीज कोसळली. ओजाराम मसराम व गुलाब खडके यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. शेतातून काम करून घरी जात असताना वीज पडल्याने 5 महिला भाजल्या. सर्व जखमी महिलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिखलदरा येथे वीज पडल्याने तीन म्हशी ठार तर 12 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटीचा जबर तडाखा बसला. वादळी वारा आणि पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन सहसंत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले.