प्रकाश आंबेडकर ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार; तर आठवले यांना लोकसभेच्या किती जागा?

| Updated on: Aug 13, 2023 | 9:11 AM

एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर आता दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवलेही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार; तर आठवले यांना लोकसभेच्या किती जागा?
ramdas athawale
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अकोला | 13 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रस्थापित पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यामुळे देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. एकीकडे बड्या आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी ही मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे छोटे राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी आपली उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली आहे. आपण अकोल्यातून लढणार आहोत. भाजप आणि आरएसएसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडणुका जिंका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

हे सुद्धा वाचा

वंचितच्या उमेदवारांना विजयी करा

देशातील परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव केलाच पाहिजे. म्हणून वंचित आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती आहे. या युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून त्यांची उमेदवारी घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

प्रकाश आंबेडकर यांनी गेल्यावेळी सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यांनी अधिक मते घेतल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.

आठवलेंना शिर्डीतून लढायचंय

एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर आता दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवलेही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा मागितल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. जेपी नड्डा यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून दोन जागा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे, असं मत रामदास आठवले व्यक्त केल आहे.

त्याच बरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा देखील आठवले यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या दरम्यान NDA च्या बैठकीत मी हे मुद्दे मांडणार असल्याचेही ते म्हणाले.