‘चिल्लर लोकांच्या नको, महाराष्ट्रातील या 4 नेत्यांच्या गाड्या फोडा’, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातील चार दिग्गज नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्या चार नेत्यांची नावेदेखील सांगितली आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत पक्षीय फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळालं होतं. पण आता रस्त्यांवर फोडाफोडी बघायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत रस्त्यांवर राजकीय फोडाफोडीच्या दोन घटना घडताना दिसल्या आहेत. या घटनांवर सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं व्यक्त व्हावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची विस्तृत अशी परंपरा राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा मानमर्यांदाचा एक विस्तृत असा इतिहास आहे. पण आता अतिशय द्वेषाचं राजकारण बघायला मिळत आहे. हे द्वेषाचं राजकारण आता रस्त्यावरच्या लढाईपर्यंत येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे गाड्या फोडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल शैलीत भाष्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील 4 मोठे आणि ताकदवान नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी थेट 4 नेत्यांची नावेदेखील घेतली आहेत.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दुसरं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरं नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चौथं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या नेत्यांच्या गाड्या फोडा. या चिल्लरफाल्लरांच्या काय गाड्या फोडता?”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
गाड्या फोडाफोडीच्या नेमक्या काय घटना घडल्या?
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा राग मनात धरुन संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी काल जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली.
जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्याआधी तशीच घटना एक दिवस आधी अकोल्यात घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. त्यांची ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतापात अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडीची तोडफोड केली होती.