मोठी बातमी : कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख का बदलली?
पिंपरी चिंचवडआणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. २७ फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला. नवीन तारीख २६ फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागेवर आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक २७ फेब्रवारी रोजी होणार होती. परंतु बारावीच्या परीक्षेमुळे ही निवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे.
पुणे जिल्हा निवडणूक आयोगाने एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्या अहवालात कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या दिवशी बारावीची परीक्षा होत असल्याचे म्हटले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम कसा?
- निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 31 जानेवारी 2023 रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
- 06 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
- 08 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
- 10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
- 27 फेब्रुवारी 2023 रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
- 02 मार्च रोजी मतमोजणी होईल.
ठाकरे गटाची तयारी
कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? याबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केली. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.ही निवडणूक लढायला हरकत नाही असा कालच्या बैठकीचा सूर आहे. जरी निवडणुकीतून दूर राहिलो तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील. त्यामुळे निवडणूक होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.