आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. अशातच आमिर खानने नुकतीच धनंजय यांची भेट घेतली.

बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खानने सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळतंय. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता. या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात आमिर हा धनंजय आणि विराज देशमुख यांच्याशी चर्चा करताना दिसून येत आहे. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.




3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातत संतापाची लाट उसळली. या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला. हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत. या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रातदेखील याचा उल्लेख आहे. “6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग इथले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती. तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली”, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.