तर अन्सारी कुटुंबाचा जीव वाचला असता; एक नजर चूक अन्…
पुण्यातील लोणावळा येथील भूशी डॅम येथे मोठी दुर्घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे पाचही जण वाहून गेले. त्यामुळे अन्सारी कुटुंबावर मातम पसरला आहे. अन्सारी कुटुंब हे आग्राहून पुण्यात नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी आले होते.
![तर अन्सारी कुटुंबाचा जीव वाचला असता; एक नजर चूक अन्... तर अन्सारी कुटुंबाचा जीव वाचला असता; एक नजर चूक अन्...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Lonavla-Bhushi-Dam.jpg?w=1280)
लोणावळ्यात काल पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. अन्सारी कुटुंबातील हे सर्व लोक होते. आग्र्याहून पुण्यात नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर या कुटुंबाने पिकनिकला जायचं ठरवलं. पिकनिकला म्हणून भूशी डॅम परिसरात आले आणि धरणाच्या पाण्याचा स्तर अचानक वाढल्याने या कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या डोळ्यादेखत कुटुंबातील लोक वाहून जात होती. पण त्यांना वाचवता आलं नाही. अन्सारी कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य वाचू शकले असते. पण एक नजर चूक झाली आणि कुटुंबातील पाचही जणांना जलसमाधी मिळाली.
अन्सारी कुटुंबातील 9 जण लोणावळ्यात भूशी डॅमला पिकनिकसाठी आले होते. धरणाच्या बॅक वॉटरमध्ये हे लोक पर्यटनाचा आनंद घेत होते. पण त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. या लोकांना काही अंदाज आला नाही. बॅक वॉटरमध्ये पाचजण होते. इतर लोक दूर खडकावर होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने एकच आरडाओरड सुरू झाली. वाचवण्यासाठी पाचही लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. पाण्यााच प्रवाह वाढल्याने हे पाचही जण एकमेकांना बिलगले. एकमेकांना घट्ट मिठी मारून पाण्याच्या प्रवाहात तग धरून राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पाण्याची एक मोठी लाट आली आणि या सर्वांची ताटातूट झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
फलक वाचला असता तर…
दरम्यान, या परिसरात जाण्यासाठी बंदी आहे. तरीही अन्सारी कुटुंब या धबधब्याकडे आले. त्यांना इथल्या परिसराची माहिती नव्हती. शिवाय धबधब्याच्या परिसरातील सावधानतेचा सूचना फलक कुणीच वाचला नाही. त्यामुळे ते मृत्यूच्या जवळ गेले. त्यांनी सूचना फलक वाचला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, असं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश
लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही बडगा उगारला जाणार आहे, असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
पाण्यात वाहून गेलेले
साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36)
अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13)
उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8)
अदनान अन्सारी (वय- 4)
मारिया अन्सारी (वय- 9)