कोरोनाने प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना पुण्याच्या महापौरांचा आधार, मुरलीधर मोहोळांकडून फराळ वाटप
गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटुंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटुंबियांना आधार देणे आवश्यक होते, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुणे : कोरोनामुळे कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीती रिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तमसो मा: ज्योतिर्गमय’ प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो. हाच धागा लक्षात घेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दुःखात असलेल्या कुटुंबियांना फराळ आणि संदेशपत्र घरपोच करुन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रात ज्या शहरांत सर्वाधिक कोरोना संसर्ग झाला, त्यामध्ये पुणे शहराचं नाव सर्वांत अग्रभागी घ्यावं लागेल. तसंच पुण्यात कोरोनामुळे गेलेल्या बळींचे आकडेही मोठे आहेत. हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेकरांनीही भक्कम साथ दिली
पाच हजार कुटुंबियांना आधार
पुणे शहरात गेल्या वर्षभरात कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास आहे. या सर्व कुटुंबियांना आपण आधार दिला. कोरोनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या जवळपास साडेचार हजार नागरिकांच्या कुटुंबियांना फराळ देऊन कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही जवळपास पाच हजार कुटुंबियांना हा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
संदेशपत्र आणि फराळ पोहोचवला
गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटुंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटुंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत, असं मोहोळ यांनी सांगितलं.
दुःखाचा डोंगर मागे सारुन नवी पहाट
आपल्या हिंदू संस्कृतीत कुटुंबियांतील सदस्य गमावल्यास जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकट काळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारुन नवी पहाट अशा कुटुंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न म्हणून कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः काही कुटुंबियांकडे जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असून संपूर्ण पाच हजार कुटुंबियांमध्ये फराळ पोहोच करण्यात येत आहे, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
‘त्या’ कुटुंबियांना अनोखा ‘आधार’!
कोरोनामुळे कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीतिरिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तम सोमा ज्योतिर्गमय’प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो. pic.twitter.com/aH8T5jMfRe
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 31, 2021
संबंधित बातम्या :
पुणेकरांसाठी गुड न्यूज, एकही कोरोना मृत्यू नाही, 8 महिन्यानंतर पहिल्यांदाचा सुटका