Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र, या राज्याला धोका, मान्सून किती तासांत महाराष्ट्र व्यापणार

| Updated on: Jun 12, 2023 | 9:09 AM

Monsoon Update : राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन झाले आहे. आता मान्सून येत्या काही तासांमध्ये राज्यभर पसरणार आहे. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होत आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडणार आहे.

Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र, या राज्याला धोका, मान्सून किती तासांत महाराष्ट्र व्यापणार
rain and cyclone
Follow us on

पुणे : येत्या 24 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ आणखीन तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.अरबी समुद्रात गोव्याच्या पश्चिमेस 700 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईच्या नैऋत्येस 630 किलोमीटर अंतरावर हे बिपरजॉय हे चक्रीवादळ स्थिरावलेलं आहे. आता हे वादळ हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्याचा अंदाज हा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयचा धोका असताना शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मान्सून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

बिपरजॉयचा धोका कुठे

हे सुद्धा वाचा

बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका गुजरातच्या किनारपट्टीवर बसणार आहे. पुढील काही तासांत हे वादळ तीव्र होणार आहे. या वादळामुळे वारे 125 किलोमीटर ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर हे वादळ पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत या वादळाचा अरबी समुद्रात मुक्कम आहे.

मुंबई, कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नसला तरी समुद्राच्या अंतरंगात बदल होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला असल्याचा पाहायला मिळत आहे. उंच लाटा देखील समुद्रातून बाहेर पडत आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झालेला आहे.

मान्सून कधी राज्य व्यापणार

कोकणात ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली. मान्सून दक्षिण कोकण, संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापण्यास सुरुवात केली आहे. पुढील चोवीस तासांत तो आणखी सक्रिय होणार असून येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे मान्सून लवकरच मुंबईसह महाराष्ट्र काबीज करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनची दुसरी शाखाही सक्रिय झाली आहे. ही दुसरी शाखा बंगालच्या उपसागराकडून बिहारमार्गे 48 तासांत उत्तर भारतात प्रवेश करणार आहे. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नाशिक, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पाऊस

मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. काल रात्री हलक्या पावसानंतर आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.