तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

| Updated on: Jul 11, 2023 | 3:29 PM

Ajit Pawar and BJP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. अनेक दिवसांपासून जी चर्चा होती, ते प्रत्यक्षात घडले. अजित पवार आपल्या एका गटासह भाजपमध्ये दाखल झाले. आता अजित पवार अन् भाजपमध्ये नेमके काय ठरलंय...

तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, ही प्रतिक्रिया सर्वसामान्यांची झाली आहे. कारण २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला जनतेने निवडून दिले. परंतु सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्ष आला. त्यानंतर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या ४० आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. आता भाजपसोबत येताना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? यासंदर्भात भाजप नेत्याने दावा केला आहे.

काय आहे दावा

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान संजय काकडे यांनी केले आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे लोकसभेची जागा कोणाकडे

राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा भाजप अन् मित्र पक्षाला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांचा आम्हाला फायदाच होणार आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे ९८ नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल, असे त्यांनी सांगितले. पक्षात ज्याला संधी मिळेल तो पुणे लोकसभेची जागा लढवेल, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे लोकसभेची जागा गिरीश बापट यांच्या निधनानंतर सध्या रिक्त आहे. याठिकाणी पोटनिवडणूक होणार का? हा विषय अजून निश्चित झाला नाही. परंतु पुणे लोकसभेच्या जागेसाठी संजय काकडे यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांच्यासह इतर चार, पाच जणांची नावे चर्चेत आली होती. काँग्रेसकडून विद्यामान कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला होता.